नगर – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत जिल्ह्यातील 1 लाख 3 हजार 48 पात्र लाभार्थ्यांनी अद्याप त्यांची ई-केवायसी नोंदणी केली नाही. जिल्हा प्रशासनाने वारंवार याबाबत जनजागृती करून देखील लाभार्थी शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिलेला नसून हे शेतकरी ई-केवायसी नोंदणी पासून वंचित असून त्याचे प्रमाण 17 टक्के असल्याचे आकडेवारी मध्ये दिसत आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे राज्यात सर्वाधिक लाभार्थी नगर जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे ई-केवायसी प्रलंबित राहण्याची संख्याही राज्यात सर्वाधिक नगर मध्ये आहे. दरम्यान या योजनेत लाभार्थी शेतकऱ्यांना आतापर्यंत 12 हप्त्यात एकूण 158 कोटी 93 लाख 40 हजार रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. 13 वा हप्ता लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत पात्र लाभार्थ्यास दरवर्षी 6 हजार रुपये असे 2 हजार रुपयांचे प्रत्येकी तीन हप्ते दिले जातात.
ही योजना 15 फेब्रुवारी 2019 पासून सुरू करण्यात आली तरी त्यास डिसेंबर 2018 पासून राबवण्यात मान्यता देण्यात आली आहे. पात्रतेच्या निकषानुसार कुटुंबास पती-पत्नी व त्यांच्या 18 वर्षे वरील अपत्य ज्यांचे धोरण क्षेत्र 2 हेक्टर पर्यंत आहे, ही मदत मिळणार आहे. योजनेच्या जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तालुकास्तरीय समिती अध्यक्ष उपविभागीय अधिकारी तर ग्रामस्तरीय समितीचे प्रमुख तलाठी आहे.
पात्र शेतकऱ्यांची तालुकानिहाय आकडेवारी
नगर-5 हजार 624, नेवासे-8 हजार 440, श्रीगोंदा-8 हजार 995, पारनेर- 8 हजार 229, पाथर्डी-7 हजार 961, शेवगाव – 8 हजार 766, संगमनेर-8 हजार 590, अकोले-10 हजार 245, श्रीरामपूर-2 हजार 526, राहुरी-7 हजार 501, कर्जत-8 हजार 406, जामखेड-6 हजार 991, राहाता-5 हजार 813, कोपरगाव-3 हजार 983 व इतर 1 हजार 18 असे एकूण 1 लाख 3 हजार 48 पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही. अर्थात त्यांनी नोंद केलेली नाही
जिल्ह्यात 5 लाख 90 हजार 383 पात्र लाभार्थी
जिल्ह्यात 5 लाख 90 हजार 338 पात्र लाभार्थी शेतकरी आहेत. त्यापैकी 4 लाख 87 हजार 335 म्हणजेच 83 टक्के लाभार्थ्यांनी ई-केवायसी ची नोंदणी केली आहे. तर 1 लाख 3 हजार 48 म्हणजेच 17 टक्के पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही.