पिंपरी – आषाढीवारीकरिता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने केलेले शहरातील विविध ठिकाणचे नियोजन कोलमडले. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याकरिता राज्यभरातून आलेल्या भाविकांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागला. याशिवाय स्थानिक वाहनचालकांनादेखील पोलिसांच्या अरेरावीचा सामना करावा लागला. त्यामुळे पोलिसांचे नियोजन म्हणजे मन:स्ताप असे समीकरण रूढ होऊ लागले आहे.
आळंदी येथे आषाढी, कार्तिकीवारीत सहभागी वैष्णवांना मुलभूत सुविधा पुरविण्याबरोबरच या दोन्ही वाऱ्या निर्विघ्नपने पार पाडण्यासाठी महिनाभर अगोदरपासूनच जिल्हा प्रशासन तयारीला लागते. मात्र, यंदाच्या आषाढीवारीकरिता पोलिसांनी देहू आणि आळंदी येथे केलेले वाहतुकीचे नियोजन सपशेल कोलमडले. संत तुकाराम महाराज पालखीचे काल (दि. 10) प्रस्थान झाले. त्यानंतर आज संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या प्रस्थान सोहळ्याला देहूतील लाखो भाविक हजेरी लावतात.
मात्र, वाहतूक बदलानुसार देहू-आळंदी रस्त्यावर आळंदीपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या हवालदारवस्ती येथील वाय जंक्शन येथे चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली होती. नियोजनाअभावी यामध्ये खासगी वाहनांबरोबरच देहूवरून आळंदीला जाणाऱ्या अनेक पीएमपी बसदेखील अडकल्याने बसमधील भाविकांना याचा मोठा मन:स्ताप सहन करावा लागला. त्यामुळे सुमारे एक किलोमीटर वाहनांची रांग लागली होती. तळपत्या उन्हात जीवाची काहिली झालेल्या भाविकांचे पाण्यावाचून मोठे हाल झाले. त्यातच महिला व बालकांना याचा मोठा त्रास झाला. हे सर्व भाविक माऊलींच्या पालखी प्रस्थानाच्यावेळीदेखील आळंदीत वेळेवर पोहचू शकले नाहीत. वाहतूक नियोजनाबद्दल या भाविकांनी नाराजी व्यक्त केली. असेच काहीसे चित्र आळंदीत प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर होते.
पोलिसांकडून वारी हायजॅक होत असल्याचा आरोप
यात्राकाळात कोणतीही अप्रिय घटना घडू नये, याकरिता पोलीस बंदोबस्त हवाच; मात्र त्याचा अतिरेक नको. मंदिर व परिसरातही मोठ्या संख्येने तैनात केलेले पोलीस कर्मचारी भाविकांसाठी मोठी अडचण ठरत आहेत. गरज नसताना पंखा मंडप व गाभाऱ्यातही तैनात केलेला अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला जात आहे. याशिवाय आळंदी पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या अधिकृत वाहन प्रवेश पासालादेखील न जुमाणनाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्थानिकांशी खटके उडाले.
महामार्गावर सकाळपासूनच वाहतूक रोखली
संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे रविवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड शहरात मुंबई-पुणे महामार्गावरून आगमन झाले. मात्र, पालखी दुपारनंतर या मार्गावरून येणार असताना देहूरोड पोलिसांनी मुंबई-पुणे महामार्गावर निगडीकडे येणाऱ्या सेंट्रल चौकातून सकाळपासूनच वाहतूक रावेत मार्गे वळविली होती. त्यामुळे दुपारपर्यंत दुचाकी, लहान मोटारींना निगडीकडे सोडण्यासाठी वाहतूक पोलिसांशी वाहन चालक हुज्जत घालताना दिसत होते. वाहतूक वळविल्यामुळे रावेत, मुकाई चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. इतर ठिकाणीही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या
यंदा अधिक जाणवला त्रास
तीर्थक्षेत्र देहू आणि तीर्थक्षेत्र आळंदी या दोन्ही ठिकाणाहुन आषाढी वारी निघते आणि लाखोंच्या संखयेने भाविक सहभागी होतात. ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. ही दोन्ही तीर्थस्थळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येतात. दरवर्षीच्या तुलनेत याच वर्षी वारकऱ्यांना आणि स्थानिक नागरिकांना नियोजनाचा अधिक त्रास झाल्याचे दिसून येत आहे. वेळेचा आणि संभाव्य गर्दीचा विचार न करता करण्यात आलेल्या नियोजनामुळे सर्वच ठिकाणी फज्जा उडालेला दिसून येत होता.