मुंबई : राज्यात लॉकडाऊन असताना वाधवान कुटुंबातील 23 लोक महाबळेश्वरला आलेले सापडले. त्यांच्याकडे मंत्रालयाचे पत्र असल्याने त्यांना प्रवासात कुणीच अडवले नसल्याची माहिती आहे. महबळेश्वर प्रशासकीय यंत्रनेकडून तपासणी दरम्यान हे कुटुंब एका बंगल्यात सापडले. त्यांना तिथून हलवले असून पाचगणीतील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सर्वांवर 188 प्रमाणे गुन्हे दाखल केले जाण्याचीही माहिती आहे.
दरम्यान, वाधवान कुटुंबातील 23 लोकांना खंडाळा ते महाबळेश्वर यांना जाण्याची परवानगी कशी मिळाली याची चौकशी करणार, असल्याचे ट्विट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. तर, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याची चौकशी करण्याच्या मागणीचे पत्र राज्यपालांना दिलं आहे.
देश लॉकडाऊन असताना मुंबईतून महाबळेश्वरात दाखल झालेल्या वाधवान कुटुंबामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. राज्यात संचारबंदी असताना या कुटुंबाला कोणी परवानगी दिली असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवाचं पत्र असल्याने त्यांना रस्त्यात कोणीच अडवले नाही. या पत्रावर सर्व वाहनांचे क्रमांक आणि सदस्याची माहिती आहे. या पत्रामुळे खळबळ उडाली आहे.
सात गाड्यांमधून हे 23 जण मुंबईतून महाबळेश्वरमध्ये एका बंगल्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या सर्वांना पाचगणीतील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सर्वांवर 188 प्रमाणे गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुखाने दिली आहे.
डीएचएसएल दिवान हौसिंग फाईनान्स यांच्या बंगल्यावर हे सर्वजण वास्तव्यास होते. 23 मध्ये बंगल्याचे मालक आणि कामगारांचा समावेश आहे. महाबळेश्वरातील गणेश नगर सोसायटी शेजारी हा बंगला आहे. या सर्वांचे म्हणणे होते आम्हाला बंगल्यातच होम क्वॉरंटाईन करा. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता महाबळेश्वरात दाखल झाले होते.