शासकीय अधिकाऱ्यांचा कारभार : पाणी योजनांसाठी प्रयत्न नाहीच
वाघापूर – पुरंदर तालुक्याकरिता हे संपूर्ण वर्षच दुष्काळी गेले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना पावसाची ओढ लागली आहे. खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. मात्र, शासकीय कामकाजातील त्रुटी तालुक्याच्या पाचवीला पुजल्या आहेत. तालुक्यात दुष्काळी स्थिती असताना पाणी पुरवठा, कृषी सल्ला अशा सर्वच बाबींकडे “सरकारी’पातळीवर दुर्लक्ष होत आहे. गेल्या काही वर्षांत पुरंदर तालुक्याकरिता पाण्याकरिता कुठलीही ठोस योजना राबविण्यात आलेली नाही.
गुंजवणीच्या पाण्याचा गाजावाजा केला जात असला तरी वास्तव मात्र वेगळेच आहे. त्यातच, सरकारी दरबारी पिकपाण्याची आणेवारी चुकीची लागल्याचा फटका पुरंदरच्या शेतकऱ्यांना कायमच बसत आला आहे. पुरंदर तालुका दुष्काळी पट्ट्यात मोडतो, याबाबतची स्थिती जाहीर असताना महसूल खात्याच्या धोरणानुसार पुरंदर तालुक्याची आणेवारी नेहमीच 50 पैशांपेक्षा जास्त असल्याचे दाखविण्यात येते. गेल्या काही वर्षात या अहवालातील आकडेवारीत बदलल झालेलाच नाही. राज्य शासनाकडून ज्यावेळी आणेवारीचा अहवाल महसूल विभागाकडून मागविला जातो, त्यानुसार दुष्काळी तालुके तसेच दुष्काळातील मदत अथवा विविध योजना जाहीर केल्या जातात; परंतु पुरंदर तालुक्यात दुष्काळीस्थिती असताना प्रशासनाकडून याबाबीकडे दुर्लक्ष केले जात आहे. याचा परिणाम म्हणून दुष्काळी स्थितीत शासनाकडून पुरंदरकरिता कधीच विशेष निधी अथवा योजना देण्यात आलेली नाही.
पुरंदर तालुक्यातील काळदरी परिसरातील पिसाळवाडी, खराडवाडी, पेटकरवस्ती, बांदलवाडी, चिकणेवाडी, शेलारवाडी, थोपटेवाडी, बहिरवाडी, हुंबेवस्ती, विठ्ठलवाडी, रामवाडी या गावांनी दुष्काळीस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न केला असला तरी शासकीय पातळीवरून मात्र या गावांना कुठलीही मदत मिळालेली नाही. याशिवाय पिंगोरी, वाल्हा, राख, दौंडज, कोळविहिरे, नावळी, पांडेश्वर, पेलसर, रिसे, पिसे, राजुरी आदी गावांना दुष्काळीस्थितीचा सामना आजही करावा लागत आहे. तालुक्यातील वाल्हा, दौंडज, राख, पिंगोरी, खळद, गुरोळी, वनपुरी, वाघापूर, राजेवाडी, कोळविहिरे, सुपे खुर्द, मावडी क.प., साकुर्डे, धनकवडी, पिलाणवाडी, मांढर, नवलेवाडी, परिंचे, वीर, सटलवाडी, हरगुडे, हरणी, पिंपळे ही गावेही गेली काही वर्षे दुष्काळी छायेत आहेत, अशी स्थिती असताना प्रशासकीय पातळीवरून दुष्काळीस्थितीवर मात करण्याकरिता ठोस उपाय योजना होत नाही. यामुळे तालुका प्रशासनाने आणेवारी संदर्भातील चुकीच्या नोंदी बदलून त्यामध्ये दुरूस्ती करूनच शासनाकडे अहवाल पाठवावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
पाणी योजना केवळ नावापुरत्याच….
पुरंदर तालुक्यात 101 गावे व 90 ग्रामपंचायती आहेत; त्यापैकी निम्म्या म्हणजे 49 गावांकडून टॅंकरची मागणी होत असते. तालुक्यात पुरंदर उपसा, जनाई शिरसाई आणि गुंजवणीच्या पाणी योजना असल्या तरी त्या केवळ नावापुरत्याच असल्याची वस्तुस्थिती आहे. या योजनांचे पाणी सर्वत्र पोहचत नाही, यात अनेक त्रुटी असल्याने तालुक्यातील 90 टक्के शेतकऱ्यांना आजही पावसाच्या पाण्यावरच शेती करावी लागत आहे.
पुरंदर तालुक्यात शेतकऱ्यांकरिता योग्य त्या शासकीय योजना राबविण्याचा प्रयत्न केला जाईल. दुष्काळी स्थितीचा आढावा घेवून चुकीची आणेवारी लागलेली असेल तर त्यामध्ये नक्कीच दुरूस्ती करण्यात येईल. शेतकऱ्यांनीही आएपल्या अडचणींबाबत प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवावा.
– अतुल म्हेत्रे, तहसीलदार, पुरंदर