देहूगाव – या राज्यात शांतता राहिली पाहिजे, याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. शांततेत आंदोलने करा. या शांततेच्या आंदोलनात ब्रह्मास्त्र पेलण्याची ताकद आहे. या शांततेच्या आंदोलनात 70 वर्षात न्याय आणि निर्णयाच्या प्रक्रियेत आरक्षण येत नव्हते. या शांततेच्या आंदोलनामुळेच मराठा आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आले आहे, असे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
देहूत जरांगे-पाटील यांची रविवारी (दि.19) रात्री कोपरा सभा झाली. यावेळी ते बोलत होते. जरांगे पाटिळ यावेळी म्हणाले की, मराठ्यांचं एकजुटीचा विजय झाला आहे. आता राज्यभरात कुणबीच्या नोंदी मिळायला लागल्या आहेत. आजच्या दुपारी मिळालेल्या माहितीनुसार या राज्यात 29 लाख नोंदी मिळाल्या आहेत.
या आंदोलनाला मोठे यश आले आहे, असे सांगत आपल्या नेत्यांनी आता मराठ्यांच्या विरोधात बोलायला नाही पाहिजे. यांच्या स्वार्थापोटी हे आपल्यात वाद निर्माण करणार आहेत. आपणही या षडयंत्रात गुंतायचे नाही. राजकारण्यांच्या स्वप्न साकार करण्यासाठी आपण एकमेकात झुंजायचे नाही, असे यावेळी ते म्हणाले.
भोर येथील दौऱ्यानंतर कात्रज देहूरोड बाह्य वळण महामार्गाने रविवारी (दि.19) रात्री साडे अकराच्या सुमारास देहूरोड येथील सेंट्रल चौकामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर तिर्थक्षेत्र देहू येथे मुख्य प्रवेशद्वाराजवळ दहा जेसीबीमधून जरांगे-पाटील यांच्या वाहनावर फुलांचा वर्षाव करीत तीस 20 फूट पुष्पहाराने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुख्य मंदिरामध्ये श्री विठ्ठल रुक्माई,श्री संत तुकाराम महाराज यांचे दर्शन घेतले संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने अध्यक्ष विश्वस्तांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .त्यानंतर जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी आरक्षणासाठी शहीद झालेल्या तरूणाच्या चिंबळी येथील कुटुंबीयांना भेट घेतली.