सातारा – जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध आणि अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवारी पुकारण्यात आलेल्या बंदला संपूर्ण सातारा जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. व्यापारी दुकानदारांनी सर्व व्यवहार दिवसभर बंद ठेवले होते.
मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या सदस्यांनी शिवतीर्थावर जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने केली. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त येथे तैनात करण्यात आला होता. अत्यावश्यक सेवा वगळता सातारा, कराड, फलटण तसेच जिल्ह्यातील बहुतांश आगारांमधील एसटी बसेस बंद राहिल्याने प्रवाशांची मात्र गैरसोय झाली. त्यांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर जालना पोलिसांनी लाठीमार केला. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या वतीने सातारा जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. सोमवारी या बंदला संपूर्ण सातारा शहरासह जिल्ह्यातून जोरदार प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील बहुतांश शहरांमध्ये कडकडीत बंद पाळला गेला. शाळा- कॉलेजसना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या. अत्यावश्यक सेवा आणि प्रशासकीय कार्यालयांमधील कामकाज वगळता सर्व काही बंद राहिल्याने जिल्ह्याचा गावगाडाच ठप्प झाल्याचे आज प्रकर्षाने जाणवले.
सातारा शहरात महाराष्ट्र क्रांती मोर्चा समन्वय समितीतर्फे येथील पोवई नाक्यावर निदर्शने करण्यात आली. तत्पुर्वी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून घोषणाबाजी झाली. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या संदर्भात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निर्देशानुसार ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.समन्वय समितीच्या सदस्यांनी दुपारी पोलीस अधीक्षक समीर शेख यांची पोलीस मुख्यालयात भेट घेऊन जालना लाठीमार प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणात मराठा आंदोलकांनी शांततामय मार्गाने निषेध व्यक्त करून सहकार्य करावे असे आवाहन श्री. शेख यांनी केले. समितीचे समन्वयक डॉ. संदीप पोळ यांनी जालन्यातील घटनेचा निषेध केला. मराठा क्रांती मोर्चा हा अत्यंत शांततामय मार्गाने चालणारा लढा आहे. आजपर्यंतचे मोर्चे सनदशीर मार्गाने होते. मात्र जालना येथे झालेला प्रकार हा निंदनीय असून मराठा समाजाची ताकद प्रचंड मोठी आहे.
त्यांना आरक्षण मिळावे ही रास्त मागणी आहे. मात्र असे प्रकार झाल्यास ते सहन केले जाणार नाहीत असा संताप यावेळी व्यक्त झाला. समन्वय समितीचे जेष्ठ पत्रकार शरद काटकर, अमोल मोहिते, अविनाश कदम, किशोर शिंदे व सर्व मान्यवरांनी या प्रकरणाचा निषेध करत पोलीस मुख्यालयाच्या बाहेर घोषणाबाजी केली. तत्पूर्वी सातारा शहरातून पोवईनाका ते राजवाडा तेथून मोती चौक मार्गे पुन्हा कर्मवीर पथावरून पोवई नाका अशी दुचाकी रॅली काढण्यात आली. महाबळेश्वर तालुक्यामध्ये मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकातून दुपारी बारा वाजता मोर्चा काढण्यात आला.
हा मोर्चा डॉक्टर साबणे रोड मार्गे नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, बसस्थानक, बाळासाहेब ठाकरे चौक, तहसीलदार कार्यालयापर्यंत हा मोर्चा नेण्यात आला. त्याचबरोबर कोरेगावमध्ये मोर्चा काढण्यात आला. फलटणमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले. वाई ते सातारा असा लॉंग मार्च सुद्धा काढण्यात आला होता. या लॉंग मार्चमध्ये सुमारे पाचशेहून अधिक बांधव सहभागी झाले होते. लोणंद, दहिवडी, वडूज, कराड, पाटण, म्हसवडसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून मराठा क्रांती मोर्चाला जोरदार प्रतिसाद मिळाला. बंदमुळे महत्त्वाची एसटी सेवा कोलमडल्याने प्रवाशांचे मात्र हाल झाले. लांब पल्ल्याच्या बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. सुमारे 112 फेऱ्या रद्द झाल्याचे सांगण्यात आले.