कोपरगाव – महाविकास आघाडी सरकारने निळवंडे कालव्यांसाठी एकरकमी हजारो कोटी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे कालव्यांच्या कामाला गती मिळाली. त्यामुळे चातकाप्रमाणे निळवंडेच्या पाण्याची वाट पाहणाऱ्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सुखावणारा आहे. अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला निळवंडे कालव्यांचा प्रश्न सुटल्यामुळे दुष्काळी भाग हरित होणार याचा आत्मिक आनंद होत असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.
वाकडी येथे लाभधारक शेतकऱ्यांनी आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते निळवंडे कालव्याच्या पाण्याचे जलपूजन केले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी गौतम बॅंकेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कोते, निळवंडे कालवे कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, कार्याध्यक्ष गंगाधर गमे, तालुकाध्यक्ष जालिंदर लांडे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष विजयराव ढोकचौळे, समन्वयक संजय एलम, प्रभाकर एलम, संघटक मच्छिंद्र एलम, रावसाहेब गाढवे, सुनील खटके, गणेश लहारे, आण्णासाहेब कोते, सोपान वाघ, सुरेश वाघ, मुरलीधर शेळके, विठ्ठल शेळके, अनिल रक्टे, उपसरपंच कारभारी बोंडे आदी उपस्थित होते.
आ. काळे म्हणाले की, निळवंडे धरणाच्या उर्ध्वप्रवरा डावा अंत्य कालव्याच्या 14.500 किलोमीटर पैकी 12.800 किलोमीटरपर्यंत वाकडी, खंडाळा, श्रीरामपूर परिसरात पाणी पोहोचले आहे. यापुढील काळात चाऱ्यांचे अस्तरीकरण, बंदिस्त जलवाहिनी वितरण प्रणाली आदी कामांसाठी निधीची आवश्यकता भासणार आहे. तो निधी लवकरात लवकर कसा उपलब्ध होईल यासाठी पाठपुरावा करून लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचणे गरजेचे आहे.