पुणे – ‘आरटीई’ 25 टक्के राखीव जागांवर आतापर्यंत 47 हजार 463 बालकांचे प्रत्यक्ष शाळांमध्ये प्रवेश निश्चित झाले आहेत. प्रवेशासाठी 8 मे मुदत आहे. अद्यापही 54 हजार 383 प्रवेशाच्या जागा रिक्तच आहेत. सोयीच्या शाळा मिळत नसल्यामुळे पालकांकडून बालकांच्या प्रवेशासाठी पाठ फिरविली जात आहे.
राज्यात 8 हजार 823 शाळांमध्ये 1 लाख 1 हजार 846 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यासाठी 3 लाख 64 हजार 413 बालकांच्या पालकांकडून ऑनलाइन प्रवेश अर्ज दाखल करण्यात आले होते. लॉटरीद्वारे 94 हजार 700 बालकांना प्रवेश जाहीर करण्यात आले होते. पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करुन शाळांमध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठी 13 एप्रिलपासून सुविधा उपलब्ध होती.
सुरुवातीला ‘आरटीई’ पोर्टलची गती मंदावली होती. पोर्टल सुरळीत झाल्यानंतर प्रवेश सुरू झाले. परंतु, हवी ती नामांकित शाळा मिळाली नाही. त्यामुळे लॉटरी लागूनही पालकांनी निरुत्सुकता दाखवली. प्रतीक्षा यादीत 81 हजार 129 बालकांचा समावेश आहे.