भोसरी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दहा वर्षांची कारकीर्द चांगली असल्यामुळे तिसर्यांदा ते पंतप्रधान होणार आहेतच. त्यांचे हात बळकट करण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांना विजय करण्यासाठी आपण सगळे कामाला लागू या. भोसरी विधानसभा मतदार संघातून आढळराव यांना एक लाखापेक्षा अधिकचे मताधिक्य मिळवून देण्याची जबाबदारी माझी असे प्रतिपादन भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केले.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप पदाधिकार्यांची समन्वय बैठक घेतली. यावेळी आमदार लांडगे बोलत होते. यावेळी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार राहुल कुल, हडपसरचे माजी आमदार योगेश टिळेकर, माजी मंत्री बाळा भेगडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, आशाताई बुचके,
जयश्री पलांडे, आबा तुपे, जयसिंग एरंडे, डॉ. ताराचंद कराळे, राम गावडे, संतोष खैरे, आदींसह शिरूर लोकसभेतील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बैठकीमुळे भोसरी व जुन्नर तालुक्यासह आंबेगाव, खेड, शिरूर, हवेली व हडपसर मधील भाजपा कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागणार असल्याने शिवाजीराव आढळराव यांना अधिक बळ मिळण्यास फायदा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगामध्ये भारताचा आदरयुक्त दबदबा निर्माण झाला आहे. राज्यामध्ये महायुती आहे. सगळ्यांच्या विचाराने शिवाजीराव आढळराव यांना शिरूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. त्यांना सर्वांधिक मतांनी विजयी करण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. खासदार अमोल कोल्हे या मतदार संघात कधी फिरकले नाहीत. याउलट शिवाजी आढळराव यांनी मागील पाच वर्षांत मतदार संघात जास्तीत जास्त कामे केली आहेत. -चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष भाजप