सासवड, (वार्ताहर) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचे विचार रुजवले त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जगामध्ये ओळख निर्माण झालेली आहे. सासवड शहरांमध्ये नगरपालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने अभ्यासिका निर्माण केली असून यामधून पुरंदर तालुक्यातील 10 पोलीस निरीक्षक तयार झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शांततेचा संदेश दिला असून त्यांचे विचार जतन करणे गरजेचे असल्याचे मत पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी व्यक्त केले.
सासवड (ता. पुरंदर) येथे डॉ. आंबेडकर उद्यानात बहुजन हक्क परिषद यांच्या वतीने डॉ. आंबेडकर, महात्मा फुले, व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार संजय जगताप बोलत होते.
यावेळी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी आमदार अशोक टेकवडे, सुनील धिवार, आदी मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन तसेच त्रिचरण पंचशिलाचे पूजन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अॅड. विजय भालेराव, विष्णू भोसले, वामनराव जगताप, साकेत जगताप, अभिजित जगताप,
अमोल जगताप, कृष्णा फुलावरे, महादेव खेंगरे पाटील, रवींद्र फुले चंद्रकांत फुले, संजय चव्हाण, दिलीप गिरमे, जयसिंग जगताप, मुन्ना तांबोळी, सागर चव्हाण, बंडूकाका जगताप, बाळासाहेब भिंताडे, रोहित खवले, प्रकाश धिवार, संदीप टिळेकर, विजय वढणे, अजित जगताप, मनोहर जगताप आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन बहुजन हक्क परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोष डुबल यांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील धिवार यांनी तर शशिकांत गायकवाड यांनी आभार मानले.