खालापूर, (वार्ताहर) – लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी शासन विविध प्रयोग करून जनजागृती करत असून विविध कल्पना राबवावे, असे खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांनी सांगितले.
या वेळी मतदान करून आलेल्या ग्राहकांना मतदानाच्या दिवशी बिलामध्ये 10 टक्के सवलत द्यावी व तशा प्रकारचे फलक आपल्या हॉटेलमध्ये लावावेत. तालुक्यातील वीट भट्टी व्यावसायिकांनी कामगारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी देत त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे.
सुचनांचे जो पालन करणार नाही अशांवर कारवाई केली जाईल, असेही खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांनी सांगितले. मतदान करणे हा आपला अधिकार आहे आणि तो मी बजावणार अशी संकल्पना राबविण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहे.
आपल्या परिसरातील लोकांमध्ये जनजागृती करून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित करणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे समजूनच आपण खालापूर तालुक्यातील मतदारांमध्ये प्रबोधन करावे. आगामी लोकसभा निवडणुकीत खालापूर तालुक्यात शंभर टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजवावा, असे आवाहन तहसीलदार आयुब तांबोळी यांनी केले आहे.