सातारा, (प्रतिनिधी) – भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरण्यात आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले.
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहामध्ये साजरी करण्यात आली. याप्रसंगी याशनी नागराजन बोलत होत्या. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, कृषी विकास अधिकारी विजय माईनकर शिक्षणाधिकारी (योजना) अंनिस नायकवडी, उपशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे उपस्थित होते.
प्रशासनाची सर्व संरचना ही राज्यघटनेवर आधारित आहे. सर्वांना समान न्याय, समान संधी देण्याचे काम राज्यघटनेच्या माध्यमातून होत असते. या राज्यघटनेची निर्मिती डॉक्टर आंबेडकरांनी केली असून आंबेडकरांचे विचार आचरण्यात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.
यावेळी प्रमुख वक्तर रविंद्र खंदारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. प्रास्ताविक शबनम मुजावर यांनी केले. सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षिका जयमाला चव्हाण यांनी केले. अधिक्षक हेमंतकुमार खाडे यांनी आभार मांनले.