श्रीनगर – काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्यात आल्यानंतर तेथे उद्भवणाऱ्या स्थितीबाबत प्रत्यक्ष त्या राज्यात जाऊन जबाबदारी पार पाडणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी चर्चा केली. गेल्या मंगळवार पासून डोवाल हे या ठिकाणी ठाणमांडून बसले आहेत. तेथील उपाययोजनांच्या संबंधात त्यांनी राज्यपालांना माहिती दिली.
लोकांपर्यंत पोहचून त्यांना आवश्यक ती मदत देणे आणि त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पुरवठा सुरळीत ठेवणे याला प्राधान्य दिले जात आहे. राज्यपालांनीही प्रशासनातर्फे राज्यातील स्थिती सुरळीत ठेवण्याच्या संबंधात केल्या गेलेल्या उपायांविषयी डोवाल यांच्याशी चर्चा केली.
आज काश्मीर विषयक निर्णय घेण्यात आल्यानंतरचा पहिला शुक्रवार असल्याने आज सुरक्षा दलांची कसोटी लागणार होती. शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी या खोऱ्यातील नागरीकांना मोकळीक देण्यात आली होती. पण त्यांना त्यांच्या घराजवळील स्थानिक मशिदीतच प्रार्थनेसाठी जाण्याचा सल्ला देण्यात आला होता.