पुन्हा एकदा ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित
मुंबई – गेल्या पाच वर्षात देशातील 6 लाख कंपन्या बंद झाल्या आहेत. त्यामुळे सध्या अभूतपूर्व बेरोजगारी आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी 370 कलम रद्द करण्याबद्दल सांगताना काश्मीरात आम्ही रोजगार निर्माण करु असे आश्वासन दिले आहे. पण मग ज्या राज्यात तरुण बेरोजगार होतोय त्या राज्यांचे काय?, असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशातील बेरोजगारीवरुन सत्ताधारी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
उद्या महाराष्ट्राचे लचके तोडतील
काश्मीरप्रमाणे उद्या महाराष्ट्राचे लचके तोडले जातील. आज काश्मीर आहे, उद्या विदर्भ आणि मुंबई असेल. उद्या तुमच्या घराबाहेर बंदूक घेऊन उभे असतील. महाराष्ट्रात इंटरनेट, टीव्ही, मोबाइल बंद केले जातील. महाराष्ट्राचे लचके तोडले जातील. हे फक्त महाराष्ट्रापुरतं नसून इतर राज्यांसाठीही लागू आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. उद्या महाराष्ट्रावर वरवंटा फिरेल तेव्हा तुमची जात पाहून नाही तर मराठी म्हणून फिरेल, असा इशाराही त्यांनी दिला.
मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी आज पहिल्यांदा मनसे कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी राज्यातील पुरस्थितीमुळे 21 तारखेला होणारा ईव्हीएमविरोधी मोर्चा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले. हा मोर्चा 28, 29 ऑगस्ट दरम्यान होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी राज ठाकरे यांनी सर्वात प्रथम जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करत या सगळ्या लोकांना माज आला आहे, असा संताप व्यक्त केला. कोल्हापूर-सांगली परिसरात मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पाहणी करतात, खाली उतरत नाहीत. गिरीश महाजन सेल्फी काढत आहेत. यांना कसलाही फरक पडत नाही. कारण यांना ठाऊक आहे मतदान यांनाच होणार, अशी टीका त्यांनी केली.
यावेळी लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयावर त्यांनी सवाल केला आहे. भाजप विरोधात राज्यातील सर्व पक्ष एकत्रित आले तरी आम्हीच जिंकणार, असे भाजपचा एक पदाधिकारी मनसे नेते बाळा नांदगांवकर यांना बोलल्याची माहिती राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिली.
लोकसभा निकालानंतर आपण 23 मे ला “अनाकलनीय’ अशी एकच प्रतिक्रिया व्यक्त केली होती, हे कसं झालं हे कळत नाही. निवडणुकीत हार जीत होत असते, पण कोणी फसवत असेल तर कसं चालेल, सगळे फिक्स असेल तर एवढी मेहनत करायची कशाला?’, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.