आजपासून शाळा, महाविद्यालय सुरु
श्रीनगर – जम्मूमधून कलम 144 (जमावबंदी) हटवण्यात आले आहे. शनिवार म्हणजेच 10 तारखेपासून सर्व शाळा आणि कॉलेज सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जम्मूच्या उपायुक्त सुषमा चौहान यांनी दिली आहे. जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याची घोषणा करण्याआधीच सुरक्षेच्या पार्श्वभुमीवर राज्यात 144 कलम लागू करण्यात आले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये गेले पाच दिवस असलेली जमावबंदी असल्याने तणावपूर्ण परिस्थिती हळूहळू निवळते आहे. शुक्रवारी प्रशासनाने फोन आणि इंटरनेट सेवा अंशत: सुरू केल्या. यानंतर जम्मू आणि श्रीनगरच्या बाजारात थोडी वर्दळ दिसली. लोक शुक्रवारची नमाज अदा करण्यासाठी मशिदीत गेले. अनेक ठिकाणी लोक आवश्यक वस्तूंची खरेदी करत होते.
कलम 370 रद्द केल्यानंतर जमावबंदी हटवण्यात आली असल्याने सुरक्षा यंत्रणांना सुरक्षेकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्यातील परिस्थितीचा आढवा घेतला. श्रीनगरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये मलिक यांनी शुक्रवारी नमाज अदा करण्यासाठी बाहेर पडणाऱ्या सामान्यांना काहीही त्रास होऊ नये यासाठी करण्यात आलेल्या बंदोबस्ताचा आढावा घेतला.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जमावबंदी लागू असतानाही उत्तर काश्मीरमध्ये पाच, तर दक्षिण काश्मीरध्ये दगडफेकीच्या दोन घटना घडल्या. राज्यामधील संवेदनशील ठिकाणांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये शोपियान, पुलवामा, अनंतनाग आणि सोपोर या जागांचा समावेश आहे.