मावळ परिसरातील ट्रेकर्स, गिर्यारोहकांनी व्यक्त केले समाधान
पवनानगर – ‘कोविड 19’च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. कोविडचे प्रमाण कमी होत असल्याने सरकारने एका-एका क्षेत्राला परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. आता गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या गिर्यारोहणाला ही परवानगी मिळाल्याने मावळ तालुक्यातील गड-किल्ल्यांवरील पर्यटन आता खुले होणार आहे. मावळ तालुक्यातील लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणा गड किल्ल्यांचे दरवाजे खुले होणार असल्याने गिर्यारोहक व गडप्रेमीसांठी आनंदाची बाब आहे.
यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी रविवारी (दि. 1) आदेश काढले आहेत. महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ व गडप्रेमी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले होते. या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी गड-किल्ल्यांवरील ट्रेकिंगला परवानगी दिली आहे. परंतु, ही परवानगी देताना काही नियम घालून देण्यात आले आहेत.
त्यामध्ये कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित स्वरुपात पुणे जिल्ह्यातील गड-किल्ल्यांवर, कातळकड्यांवर गिर्यारोहण, ट्रेकिंगसाठी जाताना एका ग्रुपमध्ये 15 पेक्षा अधिक सदस्य नसावेत, तसेच ट्रेकिंगसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे “थर्मल स्क्रिनिंग’ करणेत यावे, अधिक संख्या असल्यास वेगवेगळे ग्रुप करुन वेळेमध्ये फरक ठेवावा, ट्रेकिंगसाठी प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरणे बंधनकारक राहील, सहभागी व्यक्तींनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या सूचनांनुसार योग्य ते शारिरिक अंतर राखणेबाबतचा नियम काटेकोरपणे पाळण्यात यावा, दहा वर्षांचे आतील तसेच 65 वर्षांवरील व्यक्तींना सहभाग देऊ नये, ताप, सर्दी खोकला आदी करोनासदृश्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना सहभाग देऊ नये, स्थानिकांच्या घरात भोजन, मुक्काम आदी करू नये, एकमेकांच्या वस्तू हाताळू नयेत आदी सूचना देण्यात आल्या आहेत.