तंत्रज्ञान बदलले तरीही चित्रपटाची भाषा तशीच : डॉ. मोहन आगाशे
पुणे – काळ आणि अवकाश यामध्ये लीलया संचार करणारे सिनेमा हे प्रभावी माध्यम आहे. तंत्रज्ञान विकसित होत असले तरीही दृक्श्राव्य भाषा बदलणारी नाही म्हणून या भाषेविषयी साक्षर होणे महत्त्वाचे असल्याचे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडिया यांच्या वतीने सात दिवसीय “चित्रपट रसास्वाद’ शिबिराचे आयोजन केले आहे. याच्या उद्घाटनावेळी संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, शिबिराचे समन्वयक सतीश जकातदार, सुहास किर्लोस्कर उपस्थित होते.
यावर्षीचे हे 15 वे शिबिर असून, करोना पार्श्वभूमीवर ऑनलाइन माध्यमातून होणार आहे. यामध्ये राज्यातील विविध शहरांसह अमेरिका, सिंगापूरहूनदेखील चित्रपट रसिक सहभागी झाले आहेत. यामध्ये “चित्रपट’ या कलेचा रसास्वाद कसा घ्यावा, चित्रपटाच्या निर्मितीतील विविध बाबी, चित्रपटाचे जतन करणे आदी पैलूंचा समावेश असलेल्या शिबिरामध्ये यावर्षी जागतिक सिनेमा, भारतीय सिनेमा आणि प्रादेशिक सिनेमांचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून डॉ. मोहन आगाशे, समर नखाते, दीपक देवधर, सुहास किर्लोस्कर, अभिजित देशपांडे, अनुपम बर्वे, उमेश कुलकर्णी आदी तज्ज्ञ विश्लेषक व्याख्यान देणार आहेत.
बाळ जन्मल्यानंतर त्याला वास, चव आधी कळते. माणसाला शब्दाची भाषा नंतर समजते त्यापूर्वी त्याला दृश्यात्मकता समजते. लहान मुल दृकश्राव्य माध्यमातून नक्कल करण्यास शिकते. गेल्या वीस वर्षांत तंत्रज्ञानात झपाट्याने बदल झाले असले तरीही चित्रपटाची भाषा बदललेली नाही, त्यामुळे आपण या माध्यमासंबंधी साक्षर होणे गरजेचे असल्याचे आगाशे म्हणाले.
सुजाण प्रेक्षक तयार व्हावेत यासाठी चित्रपट साक्षरता महत्त्वाची आहे. दिग्दर्शक पडद्यावर काय मांडतो, ते प्रेक्षक म्हणून सजगपणे समजणे ही गरज आहे, असे मत मगदूम यांनी नमूद केले.