सध्या “क्रांतिकारी जन्माला यावा; पण तो शेजारच्या घरात…’ अशी मानसिकता करोनारुग्णांच्या बाबतीतही झाली आहे. अर्थात जोपर्यंत आपल्या घरात त्याची बाधा होत नाही, तोपर्यंत त्याची भयानकता आपल्याला समजतही नाही. “पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ असे म्हणण्याचे दिवस संपले. आता “प्रत्येकाला ठेच मगच तो शहाणा’, असे म्हणण्याचे दिवस आले आहेत.
तर मी देखील रॅपिड अँटिजेन चाचणीत पॉझिटिव्ह आढळलो व त्यानंतर ठढ-झउठ ने त्यावर शिक्कामोर्तब झाले. आमची स्वारी एका खासगी रुग्णालयात दाखल झाली. मग चाचण्या, त्याचे अहवाल मग डॉक्टरांचे मत, सल्ला व औषधे असे षोडशोपचार सुरु झाले. रुग्णालयात दाखल झाल्यावर स्टिरॉईड व ऍण्टासिडची इन्जेक्शन, फॅबीफ्लूच्या गोळ्या, सातत्याने दिली जाणारी सलाईन्स यांमुळे हाताची जाळी बनली. ऑक्सिजनची पातळी 97 ते 98 अशी भक्कम असल्याने कृत्रिम प्राणवायूची गरज भासली नाही हे नशिब आणि मी सुखरुप घरी देखील आलो.
आठ दिवस रुग्णालयाचा पाहुणचार घेतल्यावर व भरभक्कम दक्षिणा दिल्यावर अस्मादिकांची रुग्णालयातून अखेर सुटका झाली. मात्र शारीरिक थकवा प्रचंड होता.
“वर्क फ्रॉम होम’ करण्याची सोडा; समोर आलेले जेवणाचे ताटही संपविण्याची ताकद नव्हती. व्हिटॅमिन व कॅल्शियमच्या गोळ्यांसह मधुमेहाच्या तात्पुरत्या गोळ्यांनीही घरात ठाण मांडले. आता आपला देशच मधुमेहाची जागतिक राजधानी असल्याने त्याचे वावगे वाटत नव्हते. पण आंब्याच्या मोसमातच गोड खाऊ नका, हे कसे चालेल? रोज सकाळी नाष्ट्यानंतर, जेवणानंतर, संध्याकाळी व रात्रीच्या जोवणानंतर “वॉलेट फॉर बुलेट’ हा उद्योग सुरु झाला.
हळूहळू या गोळ्यांची संख्या रोडावली व आमची प्रकृती मूळ पदावर आली. आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना आपल्याला काहीतरी शिकवून जाते, असे म्हणतात. त्यानुसार मलाही विनाकारण फिरण्याची लाज वाटू लागली. सरकार, पोलीस यांच्यासह स्वयंसेवकही सातत्याने नागरिकांना सांगत आहेत की, “विनाकारण घराबाहेर पडू नका; करोनाचा धोका अद्याप संपलेला नाही.’ पण आम्हाला रुग्णालयात गेल्यावरच अक्कल येते ना?
आमची स्वारी आता कार्यालयीन सेवेत रुजू झाली असली तरीही कार्यालयात येताना व घरी जाताना असे अनेक अकलेचे कांदे रस्त्यांवर विनाकारण हिंडताना दिसतात व त्यांना कळकळीने सांगावेसे वाटते की, “बाबांनो करोनाला हलक्यात घेऊ नका. अनेकांचे संसार उघडे पडले आहेत, घरदार पोरके झाले आहे, विवाहाला पाच दिवस झालेल्यांनाही वैधव्य आले आहे. घरात कमावणारा एकूलता एक व्यक्तीही भींतीवर फोटोत अडकून पडला आहे.’ घरातून बाहेर पडताना अत्यावश्यक गोष्टी घ्यायला जाण्याचा बहाणा करत आहात, पण मुर्खांनो तुम्ही जिवंत राहणे हीच आज अत्यावश्यक बाब बनली आहे, हे ध्यानात घ्या.
मुंबई व पुणे या शहरांमध्ये तर करोनाने धुमाकूळ घातला आहे. तरीही दुपारी 12 वाजल्यानंतर शेकडो नागरिक कोणत्या तरी बोगस कारणाने घराबाहेर पडत आहेत. ज्यांना आपापल्या नोकरीवर जायचे असते ते समजू शकतो; पण अनावश्यकपणे रस्त्यांवर फिरणारे पाहिले की आपण खरेच साक्षर आहोत का, असा प्रश्न पडतो. संपूर्ण शहरात पोलीस आपला जीव धोक्यात घालून स्वयंसेवकांच्या मदतीने लोकांमध्ये जागृती निर्माण करताना दिसतात; पण तरीही अनेक जण “आपल्याला काही होत नाही’ अशा थाटात हिंडताना दिसतात.
सरकार आता प्रत्येक घराबाहेर तर पोलीस नाही उभे करू शकत. पण आपलीही काही जबाबदारी आहे हे देखील आपण विसरून जात आहोत. ज्यांना आर्थिक नड नाही त्यांना हे भान नसेलही कदाचित पण ज्यांची रोजची गुजराण रोज मिळत असलेल्या पैशांवर आहे त्यांचे काय होत असेल याचाही विचार करा. आपण बेजबाबदारपणे वागलो तर सरकार लॉकडाऊन वाढवेल पण त्याची शिक्षा याच रोजंदारीवरच्या किंवा दारिद्य्र रेषेखालील लोकांना भोगावी लागते हे कसे लक्षात येत नाही.
एका खासगी रुग्णालयात जेव्हा माझ्यावर उपचार सुरु होते, त्यावेळी एकदा चुकून एका नर्सच्या हातून इन्जेक्शनचे दोन बॉक्स माझ्या रुममध्ये राहीले व मला रुग्णालयांची लुटालुट कशी असते हे समजले. त्याची छायाचित्रेही मी काढून ठेवली आहेत. एकच औषध, एकाच मात्रेत व एकाच डोसचे असूनही किंमतीत जमीन आस्मानचा फरक दिसून आला. जर एका कंपनीचे इन्जेक्शन 60 रुपयांमध्ये मिळते तर दुसऱ्या कंपनीचे तेच इन्जेक्शन 225 रुपयांना कसे मिळू शकते व हेच महागडे इन्जेक्शन रुग्णाला का? ऑक्सिमिटरही चांगल्या कंपनीचे व योग्य प्रमाण दाखवणारे का नसतात? सलायन लावताना नर्सला समजत नाही, हे कसे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे कधी व कोणाकडून मिळतील हीच काय ती प्रतीक्षा आहे.