मुंबई – आयपीएल स्पर्धेत जम्मु काश्मिरचा नवोदित वेगवान गोलंदाज उमरान मलिकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. त्याचा समावेश ऑस्ट्रेलियात यंदा होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात करा अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, उमरानला इतक्यात संघात स्थान देऊ नका, तो या स्पर्धेत फारसा यशस्वी ठरला नाही तर त्याचा आत्मविश्वास खच्ची होइल, असे मत भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक व माजी कसोटीपटू रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत उमरानने आपल्या वेगवान गोलंदाजीने भल्या भल्या फलंदाजांच्या मनात धडकी भरवली होती. त्याने 157 किलोमिटर प्रतितास या प्रचंड वेगाने गोलंदाजी करत स्पर्धेतील वेगवान गोलंदाजीचे सर्व विक्रम मागे टाकले. ही स्पर्धा सुरु असतानाच उमरानचा समावेश येत्या काळात भारतीय संघात करा अशी मागणी सातत्याने सुरु होती. मात्र, उमरानला टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवडणे खूपच घाईचे ठरेल, असेही शास्त्री म्हणाले.
उमरान आत्ता रॉ मटेरियल आहे, त्याला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यासाठी त्याला वेळ द्या. तंदुरुस्ती व गोलंदाजीत अचूक टप्पा, दीशा यांवर त्याला तयार व्हायला हवे. आयपीएल स्पर्धेत त्याची गोलंदाजी पाहून मी देखील प्रभावित झालो मात्र, लगेचच त्याला इतक्या मोठ्या स्पर्धेसाठी संघात घेणे नुकसानकारक ठरेल. त्याला देशांतर्गत तसेच विश्वकरंडक टी-20 स्पर्धेपूर्वी होत असलेल्या काही मालिकांमध्ये खेळवत त्याला अनुभव मिळणे महत्वाचे आहे.
त्याला आधी एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळवले गेले पाहीजे. तसेच कसोटी क्रिकेटमध्येही त्याला खेळवले जाणे गरजेचे आहे. विविध ठीकाणच्या खेळपट्ट्यांवर तो कशी कामगिरी करतो हे पाहून मगच त्याचा टी-20 संघासाठी विचार केला जावा, असेही शास्त्री यांनी म्हटले आहे.