संगमनेर -संगमनेर तालुक्यात करोनाच्या रुग्णांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच अनेकांचा बळीही या आजाराने घेतला आहे. मात्र त्यावर उपाययोजना करण्याचे सोडून सध्या राजकीय नेत्यांत आरोप प्रत्यारोप होत असल्याने आता नौटंकी नकोत, अगोदर तालुक्यातील करोना आवरा, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना फटकारले आहे.
भाजपचे विद्यमान आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील सरकारमध्ये सहभागी असलेल्या कॉंग्रेसच्या मंत्र्यांना आणि नेत्यांना कोणीही विचारत नाही. ते कसे काय लाचारासारखे सत्तेत सहभागी आहेत, याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटत आहे. प्रदेशाध्यक्षांना कोणी विचारत नाही, अशी टीका महसूलमंत्री थोरात यांचे नाव न घेता केली होती.
याबाबत प्रतिक्रिया देताना महसूलमंत्री थोरात यांनी कधीकाळी कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राहिलेले विखे पाटील हे कसे वागले हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना मी त्यांना पाहिले आहे, असे प्रत्युत्तर देत विखे पाटील विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी काय करायचे, याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ना. थोरातांच्या या वक्तव्यामुळे नगर जिल्ह्यात दोन नेत्यांमध्ये पुन्हा शाब्दिक युद्ध होण्याची शक्यता काही जण व्यक्त करत आहेत.
सध्या हे आरोप-प्रत्यारोप सोशल मीडियावर फिरत आहेत. मात्र अनेकांनी या जुगलबंदीवर चांगलीच टीका केली आहे. तालुक्यात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. काहींना जीवही गमवावा लागल आहे. त्यामुळे करोनाचे थैमान रोखण्यासाठी उपाययोजना राबवण्यासाठी चर्चा व्हायला हवी होती.
आता तर थेट महसूलमंत्र्यांच्याच गावात करोनाने शिरकाव केला आहे. बऱ्याच दिवस सुरक्षित राहणारा राहाता तालुकाही करोनापासून वाचू शकला नाही. म्हणून आता नेते मंडळींनी नौटंकी न करता करोनाला आवर घालावा, असे नेटकऱ्यांनी फटकारले आहे.