पुणे -भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे, त्यांचे स्वागत आहे. मात्र, त्यांनी वैयक्तिकरित्या यावे, पक्ष म्हणून येऊ नये. भाजपाने मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच्या आंदोलनाला राजकीय रंग देऊ नये, असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली आहे. न्यायालयाच्या या खंडपीठाने सांगितले आहे की, 102 व्या घटनादुरुस्तीनंतर एखाद्या समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घोषित करणे हे केंद्र सरकारच्या अधिकारांमध्ये येते. राज्य सरकारला तो अधिकार नाही. मग आता जर केंद्र सरकारकडे हा विषय गेला आहे तर मग राज्याच्या भाजपा नेत्यांनी या विषयाचा पाठपुरावा करायला हवा.
सध्या आंदोलनाचा काळ नाही, करोनाचा प्रादुर्भाव जीवघेणा आहे. त्यामुळे आता राजकीय मतभेद विसरून एकत्र येण्याची ही वेळ असल्याचे पाटील यांनी सांगितले. मराठा क्रांती मोर्चाच्या काही समन्वयकांनी मात्र काही राजकीय पक्षांची ही कृती समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला राजकीय रंग देत असल्याची टीका केली आहे.
मराठा क्रांती मोर्चाने भाजपला केंद्र सरकारकडे आरक्षणाची मागणी लावून धरण्याची तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध केंद्राला लढा देण्याची मागणी करावी अशी विनंती केली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मारुती भापकर म्हणाले की, जर भाजपला आंदोलनात सक्रियपणे सहभागी व्हायचे असेल त्यांनी राजकीयदृष्ट्याही हा विषय महत्त्वाचा मानला पाहिजे. राजकीय पक्षांचे कधीच एकमत होत नाही.
ते फक्त एकमेकांशी श्रेय घेण्यासाठी लढत असतात. त्यामुळे या आंदोलनाचे महत्त्व कमी होईल. आम्हाला आरक्षणाच्या या विषयाला कोणताही राजकीय रंग द्यायचा नाही. त्यामुळे सर्व पक्षाच्या लोकांनी आंदोलनात सहभागी व्हावे, मात्र आपापले पक्ष बाजूला सारुन, असेही भापकर यांनी सांगितले.