सरकारचे काश्मीरातील लोकांना जाहीरातींद्वारे आवाहन
श्रीनगर – केंद्र सरकारने कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याच्या विरोधात काश्मीरातील बंद आज 68 व्या दिवशीही सुरूच होता. त्यावर लोकांना आवाहन करण्यासाठी सरकारने तेथील स्थानिक वृत्तपत्रांत फुलपेज जाहीरात दिली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की लोकांनी गनिमांना घाबरण्याचे कारण नाही. त्यांना गनिमांना न घाबरता आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू ठेवावेत.
आपण गनिमांच्या दबावाला बळी पडणार आहात काय? गेली 70 वर्ष जम्मू काश्मीरातील लोकांना फसवले जात होते. खोडसाळ प्रचार, हेतुपुरस्सर राबवलेला प्रपोगंडा, यातून निर्माण झालेल्या दहशतवादाच्या न संपणाऱ्या श्रृंखलेत येथील जनता पिचली होती. दारिद्य्र, विनाश आणि हिंसाचाराचा आगडोंब येथे पसरला होता. आता त्यातून बाहेर पडण्याची संधी उपलब्ध झाली असल्याची बाब या जाहीरातीत नमूद करण्यात आली आहे.
या जाहीरातीत विघटनवादी नेत्यांनी आपली मुले कशी विदेशात शिकायला पाठवली, आणि लोकांना भडकावत ते स्वता कसे श्रीमंत होत गेले याची माहिती देण्यात आली आहे. या खोऱ्यातील युवकांना दगडफेक, द्वेष आणि हिंसाचारासाठी कसे सतत भडकवत ठेवले गेले यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. आजही दहशतवादी हाच हातखंडा वापरून लोकांना नियंत्रणात ठेवत असून तुम्ही त्यांना बळी पडणार आहात काय असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
खोडसाळपणा आणि धमक्या तुम्ही चालवून घेणार आहात का? की माहितीपुर्ण निर्णय घेणार आहात हे तुम्ही ठरवायचे आहे असेही यात नमूद करण्यात आले आहे. काश्मीरातील जनतेने खोऱ्याचे हित जोपासले पाहिजे असे आवाहनही सरकारने या जाहीरातीच्या माध्यमातून केले आहे. हे आपले घर आहे, तुम्ही कशालाही अजिबात घाबरू नका असे भावनिक आवाहन करून सरकारने काश्मीरातील जनतेला आपले सारे व्यवहार सुरळीत पणे सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे.