मुंबई – तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. तत्पूर्वी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती. पवारांच्या भेटीनंतर ममतांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले.
काँग्रेसशिवाय भाजपसमोर आव्हान उभं करणं शक्य आहे का, असा प्रश्न ममतांना विचारण्यात आला. त्या म्हणाल्या की, एक मजबूत पर्याय उपलब्ध असायलाच हवा. आम्हाला देखील वाटतं सगळ्यांनी सोबत राहावं. मात्र स्पष्ट उत्तर देणं ममतांनी टाळलं.
दरम्यान शरद पवारांनी युपीएचं नेतृत्व करण्यावर तुम्ही सहमत आहात का, यावर ममता बॅनर्जी यांनी थेट युपीएच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. काय आहे युपीए, युपीए अस्तित्वात आहे का, असा प्रतिप्रश्न ममतांनी विचारला.
दरम्यान कोणत्याही पक्षाला वगळून तिसरा फ्रंट तयार होणार नाही. कोणालाही वगळण्याचा प्रश्नच नाही. सर्वांना सोबत घेऊनच लढण्याची आवश्यकता आहे. जो मजबुतीने लढेल, तोच पर्याय असेल, असं शरद पवारांनी म्हटलं.