प्रकाश राजेघाटगे
पुसेगाव – महाराष्ट्र शासनाची योजना आहे “पाणी अडवा,पाणी जिरवा,’ पण सद्यस्थितीस कोरेगाव मतदारसंघात पाण्यावरून जोरदार राजकीय भांडण सुरू आहे. यात जिहे- कठापूर योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या पाटात अजूनही खळखळत नसले तरी यावरून तालुक्यातील दोन्ही लोकप्रतिनिधी एकमेकांची जिरवायची कशी यावरच लक्ष केंद्रित करत असल्यामुळे या योजनेची कित्येक वर्षे आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या हाताला काहीच लागले नाही.
राज्यातील 1995 मधील सत्तातंरानंतर शिवसेना- भाजप युतीचे सरकार स्थापन झाले. कृष्णा खोरे महामंडळार्गत खटाव- माण तालुक्यातील दुष्काळी जनतेची तहान भागविण्यासाठी जिहे- कठापूर योजनेचा प्रारंभ करण्यात आला. गेली 25 वर्षे या योजनेची पूर्णत्वाची वाट खटाव- माण मतदारसंघातील जनता वाट पाहत आहे. पण ही योजना अजूनही पूर्ण झाली नाही, याची खंत तालुक्यातील- जिल्ह्यातील राजकीय नेत्यांना नाही.
हे चित्र पाहून बळीराजाचे मन आक्रंदून जात आहे. सुरूवातीच्या काळात युध्दपातळीवर सुरू असलेले काम 2000 नंतर बंदच पडले होते. नंतर राजकीय हेव्यादाव्यांची मालिका सुरू झाली. यात प्रत्येक राजकर्त्याने हात धुवून घेतला. पण योजना काही चालू झाली नाही. गेली 25 वर्षाच्या कालखंडानंतर मागच्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर जिहे- कठापूर योजना चालू झाली. कृष्णा नदीचे पाणी बंदिस्त पाइपलाइनने नेर तलावात सोडण्यात आले. येथून पाणी पुढे माण तालुक्यातही जायचे आहे. त्यावेळी खऱ्या अर्थाने योजना पूर्ण होईल. पण त्याअगोदरच या पाण्यावरून राजकीय कलगीतुरा रंगला आहे. बंदिस्त पाइपलाइनद्वारे होणाऱ्या या पाणीलाइनला वर्धनगड घाट परिसरात एक एअर व्हॉल्व असून येथे लिकेजचे पाणी पडत असते. हेच पाणी साधारणतः अर्धा टीयमसी असणार आहे.
कोरेगाव तालुक्यातील शिल्टी, खिरखंडी, वाघजाईवाडी, जायगांव व पुढील दुष्काळी भागासाठी वापर व्हावा म्हणून माजी पालकमंञी विजय शिवतारे यांच्या काळात कोरेगाव तालुक्यात आणण्याचा प्रयत्न राजकीय नेतेमंडळीनी केला. पण पुढे ही कल्पना रद्दबातल करण्यात आली. आता एअर व्हॉल्व्हच्या माध्यमातून पडणारे पाणी (योजनेत नसणारे) रामोशीवाडी (ता. कोरेगाव) येथील तलावात पडत असून गेल्या वर्षी या पाण्याचा वापर या भागातील शेतीसाठी झाला. पण या वर्षी याच पाण्यावरून रणकंदन माजले आहे. तसे पाहिल्यास या व्हॉल्व्हमधून पाणी लिकेज होणार असल्यामुळे वाद घालण्याचे कारण नाही. पण व्हाल्व खुला करावा किंवा बंद करावा यासाठी पाणी बचाव संघटनेमार्फत दोन्ही लोकप्रतिनिधी आपल्या गटाच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना पुढे करून एकमेकांची कशी जिरवू हेच पहात आहेत, त्यामुळे या उन्हाळ्यात सोडलेले पाणी बंद करण्याची वेळ प्रशासनावर येऊन ठेपली. यात माञ दुष्काळी जनतेची ससेहोलपट होणार आहे.
दोन्ही प्रतिनिधींनी वाद थांबवावा
वादविवाद हे सकस लोकशाहीचे प्रतीक आहे; परंतु विनाकारण वाद घातल्यास विकास खुंटतो, हे तितकेच खरे आहे. तालुक्यातील दोन्ही लोकप्रतिनिधी कधीतरी सत्तेवर होते, याचे भान ठेवून, ही योजना पूर्ण का झाली नाही, हा प्रश्न स्वतःला कधीतरी विचारावा. दोन्ही गटांना समोर बसवून वाद मिटवावा आणि पाणी सुरू करावे, असा राजकीय शहाणपणा प्रतिनिधींनी दाखवावा, हीच माफक अपेक्षा तालुक्यातील जनतेतून व्यक्त होत आहे.