कोयनानगर – धरणग्रस्तांचे ठिय्या आंदोलन गत 24 दिवसांपासून सुरु आहे. कोयनेसह बामणोली, कोल्हापूर येथेही धरणग्रस्तांचे आंदोलन सुरू आहे. बामणोलीतील आंदोलनस्थळी जाताना मला पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा फोन आला. ते म्हणाले, कोयना धरणग्रस्त उच्चाधिकार समितीच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली असून या समितीत ना. सुरेश खाडेही आहेत. आपण कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवू शकतो, असे सांगून पालकमंत्र्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे. परंतु, जोपर्यंत कोयना पुनर्वसनाबाबतची बैठक होत नाही, तोपर्यंत आपण आंदोलनावर ठाम असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.
पाटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे सचिन कदम, श्रीपती माने, महेश शेलार, सिताराम पवार, विनायक शेलार उपस्थित होते.
पालकमंत्र्यांशी फोनवर झालेल्या संभाषणाबाबत माहिती सांगताना डॉ. पाटणकर म्हणाले, आपली अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मी आपले अभिनंदनही केले होते. तसेच कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रलंबित प्रश्नावर मी आपल्याला बैठक लावायला सांगितले होते. मात्र, याप्रश्नी आजपर्यंत बैठक न लागल्याने व अन्यायकारक झालेले शासन निर्णयात दुरूस्ती करण्यासाठी धरणग्रस्त आंदोलनाला बसले आहेत. सदरचा जी. आर. राज्यातील सर्व धरणग्रस्तांना लागू आहे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री स्तरावर बैठक झाली पाहिजे, असेही आपण यांनी मंत्री देसाई यांना सांगितले असल्याचे डॉ. पाटणकर म्हणाले.
यावर मंत्री देसाई यांनी सांगितलेली माहिती देताना डॉ. पाटणकर म्हणाले, धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक आहे. मुख्यमंत्री यांच्यासोबत आपले बोलण करून देतो. आपण आंदोलन मागे घ्यावे, अशी त्यांनी विनंतीही केली. मात्र, तुम्ही आंदोलनस्थळी धरणग्रस्तांना भेटायला येऊन आंदोलकांशी संवाद साधावा, त्याचे गाऱ्हाणे ऐकावे, लोक स्वतःहून आंदोलनास बसले आहेत, मी त्यांच्यासोबत आहे, असे आपण मंत्री देसाई यांना सांगितल्याचे डॉ. पाटणकर म्हणाले.
यावर मंत्री देसाई यांनी सांगितले की, येत्या 27 मार्चला मी धरणग्रस्तांना आंदोलनस्थळी भेट देणार आहे. मुख्यमंत्री स्तरावर बैठक लागण्यापूर्वी प्रधान सचिवांची बैठक लागली पाहिजे. हा प्रश्न फक्त कोयना धरणग्रस्तांचा नसून राज्यातील सुमारे 7 लाख धरणग्रस्तांचा असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले. यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या स्तरावर बैठक होत असेल, तर त्याचे स्वागत आहे. परंतु, जोपर्यंत सदरची बैठक लागत नाही; तोपर्यंत आपण आंदोलनावर ठाम राहणार आहे, असेही डॉ. पाटणकर यांनी यावेळी सांगितले.
मंत्र्यांना आंदोलनाचा विषयच कळेना…
मंत्री, अधिकारी यांच्यात समन्वय नाही. कोणत्या विषयावर आंदोलन आहे, हे मंत्र्यांना कळत नाही; ही खेदजनक बाब आहे. यापूर्वी असे कधीही झाले नव्हते. 24 दिवसांत उच्चाधिकार समितीने आंदोलनाची माहिती घेतली नाही. किंवा प्रशासनानेही माहिती दिली नाही, ही शोकांतिका आहे, अशी खंतही डॉ. भारत पाटणकर यांनी यावेळी व्यक्त केली.
…ही गुढी संघर्षातून विजय मिळवू देणारे प्रतीक
दरम्यान, बुधवारी 22 रोजी कोयनानगर येथील धरणग्रस्तांनी आंदोलनस्थळीच गुढी उभारली होती. ही गुढी संघर्षातून विजय मिळवू देणारे प्रतीक असल्याचेही डॉ. पाटणकर यांनी यावेळी सांगितले.