डॉ. सुहास वारके : गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड करण्याचे काम सुरू
सातारा – गणेशोत्सव, मोहरम, दुर्गोत्सव या सणांबरोबर येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा क्राईम बैठकीत घेण्यात आला आहे. जिल्ह्यात गुन्हेगारांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत आहे. कराडमधील सोळवंडे खून प्रकरणी 14 संशयितांना जेरबंद केले आहे.
जिल्ह्यात टोळीयुद्ध भडकू नये याकडे विशेष लक्ष दिले जाणार असून गणेशोत्सव सर्वांनी एकोप्याने, भक्तिभावाने आणि डॉल्बीमुक्त वातावरणात साजरा करावा, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी केले.
साताऱ्यात झालेल्या क्राईम बैठकीनंतर शिवतेज हॉलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील उपस्थित होते.
वारके म्हणाले, मोहरम व गणेशोत्सव एकाच वेळी येत असून त्या अनुषंगाने पोलीस आणि शांतता कमिटीची बैठक झाली. मोहरमनंतर नवरात्रोत्सव, विधानसभा निवडणुकांची तयारी पोलीस प्रशासन करणार आहे. कराड येथील सोळवंडे खून प्रकरणानंतर पोलीस लगेचच संशयितांच्या मागावर होते. आतापर्यंत 14 संशयितांना अटक करण्यात आली असून अन्य संशयितांचा शोध सुरू आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर टोळीयुद्ध भडकू नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीपूर्वी गुन्हे दाखल असणाऱ्या संशयितांवर कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात “मोक्का’च्या 40 प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. यासंदर्भात आता कोणताही प्रस्ताव प्रलंबित नाही. जिल्ह्यात निर्भया पथकाच्या माध्यमातून चांगले काम सुरू आहे.
पुढील काळात महाविद्यालयांमध्ये जागृती करण्यात येणार आहे. अनेकदा सायबर गुन्हे घडतात. मात्र, त्यावर काय करावे, हे कळत नसल्याने नागरिक तक्रार करण्यासाठी पुढे येत नाही. या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये व युवकयुवतींमध्ये जागृती करण्यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये कॅम्प घेण्याचा मानस आहे. महामार्गालगतच्या गावांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचा संकल्प आहे. त्यामुळे महामार्गावर घडणाऱ्या गुन्ह्यांवर प्रकाश टाकण्यास मदत होणार आहे. त्यासाठी महामार्गाकडेला असणाऱ्या ग्रामपंचायती आणि धाब्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“मोक्का’च्या कारवाईला प्राधान्य देऊन नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती प्रशासनाने चांगल्या पद्धतीने हाताळली. महामार्गावर अडकून पडलेल्या विविध राज्यांच्या ट्रकचालकांना जेवण व अन्य साहित्य उपलब्ध करण्यात पोलिसांनी पुढाकार घेतला. जिल्हा पोलीस दलाच्या कामाचे समाजातून कौतुक झाल्याचे वारके यांनी सांगितले.