प्रवासासाठी ई पास नियमही रद्द
हॉटेल व लॉज सुरू करण्यास परवानगी
मेट्रो, शाळा,
सिनेमा गृह बंदच
सरकारी कार्यालयात सोशल डिस्टन्सिंग
मुंबई – राज्य सरकारने अनलॉक-4च्या गाईडलाईन्स आज जाहीर केल्या आहेत. केंद्राच्या सूचनेनंतर ठाकरे सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्यातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. मार्च महिन्यापासून राज्यात सुरु असलेली जिल्हा बंदी अखेर उठली आहे. राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी लागणारा ई पास अखेर राज्य सरकारने रद्द केला आहे.
मुंबईत विमानांची उड्डाण आणि लॅंडिंगची संख्या 1 सप्टेंबरपासून दुप्पट करण्यात येणार आहे. आतापर्यंत एकूण 100 विमानांच उड्डाण आणि लॅंडिंग होतं, आता ही संख्या दुप्पट होणार आहे. त्याचबरोबर आता जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी ई पासची गरज नसणार आहे. हॉटेल आणि लॉज सुरू होणार आहेत. मात्र मेट्रो, सिनेमा गृह बंदच राहणार आहे.
मुंबई आणि एमएमआरमध्ये शासकीय कार्यालय 30 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत, तर उर्वरित महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात 50 टक्के कर्मचारी उपस्थित राहतील. या सर्व कार्यालयांमध्ये सोशल डिस्टन्स या नियमावलीचे पालन करणे अनिवार्य राहील. शाळा मात्र सप्टेंबर अखेरपर्यंत सुरु करता येणार नाहीत. ऑनलाइन क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे लागेल. त्याचबरोबर कॅन्टोन्मेंट झोन भागांमध्ये आधीचेच नियमावली परत लागू राहील. स्थानिक परिस्थिती बघून जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त याबाबत अंतिम निर्णय घेतील. दरम्यान, करोना व्हायरसच्या महासंकटात 1 जूनपासून हळूहळू अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. अनलॉकचा चौथा टप्पा 1 सप्टेंबरपासून सुरू होत आहे.
या गोष्टींना परवानगी
हॉटेल आणि लॉज यांना 100 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी
खासगी कार्यालय क्षमतेच्या 30 टक्के कर्मचाऱ्यांसोबत काम सुरू करू शकतात.
प्रवासी तसेच मालाच्या आंतरराज्य प्रवासासाठी ई-पासची अट रद्द.
खासगी बस, मिनी बस तसंच इतर ऑपरेटर्सना परवानगी
कोणत्याही अटीविना प्रवासास आणि जाण्यायेण्यास परवानगी.