पैंगोग सीमेवर भारत-चिनी
सैनिक पुन्हा आमने-सामने
लडाख – भारत-चीन लडाखच्या सीमेवरील तणाव शांत होण्याचे नाव घेत नाही. मुजोर चीनकडून कुरापती सुरूच असल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. अनेकवेळा केलेल्या चर्चा आणि कराराचं चीनकडून वारंवार उल्लंघन करण्यात येत आहे. गॅलवान खोऱ्यानंतर आता पुन्हा एकदा लडाखमध्ये तणाव निर्माण झाला आहे. पैंगोग त्सो झील येथे 29 ऑगस्टला रात्री उशिरा भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य आमने-सामने आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
चीनने भारतीय सीमांमध्ये पुन्हा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला असून भारतीय सैन्यातील जवानांनी ड्रॅगनचा हा डाव उधळून लावल्याची माहिती मिळाली आहे. गलवान खोऱ्यानंतर चीनने आपले सैन्य आणि टेन्ट हलवून पैंगोग त्सो झील भागात नेण्यास सुरू केले होते. चीनच्या या सर्व हालचालींवर भारताची नजर होती. त्यामुळे चीन काहीतरी कुरापती करणार याची चाहूल लागल्याने ड्रॅगनचा डाव उधळून लावण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) तयार केलेल्या सहमतीच्या शर्तींचे उल्लंघन करत पूर्व लडाखच्या भागामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याने पांगोंग आणि पांगोंग लेक क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या चीन सैन्याचा डाव उधळून लावला आहे. सध्या तिथल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे आणि शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांच्या सैन्य दलांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
चीनने लडाखमध्ये असणारी जैसे थे परिस्थिती बदलण्याचा एकतर्फी प्रयत्न केल्यानंतर लडाखचे नायब राज्यपाल आर. के. माथूर हे दिल्लीला पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या घटनेनंतर सातत्यापूर्ण बैठका घेत असून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
ब्रिगेड कमांडर पातळीवर ध्वज बैठक चिशूल येथे घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्याबाबत कोणतेही भाष्य करण्यात आले नाही. दुसऱ्या बाजूल चीन सैन्य माघारी घेण्याची कोणतीही कृती करत नाही.
रस्ते उभारणी, हेलीपॅड आणि अन्य लष्करी संसाधने उभारण्याची त्यांची कामे सुरूच आहेत. चीनच्या या करावायांची दखल घेत भारतीय बाजूनेही तोफदळ, शस्त्रसाठा सज्ज ठेवण्यात आला आहे. जमिनीवरून हवेत मारा करू शकणारी क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आली आहेत.