पिंपरी – कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधुन शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सानेगुरूजी कृतीशील गुणवंत पुरस्कार देऊन नुकताच सन्मान करण्यात आला. चिंचवड येथील आनंद मंगल एज्युकेशन ट्रस्टच्या स्वानंद सभागृहात हा कार्यक्रम झाला.
ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स आणि स्वानंद महिला संस्था यांनी संयुक्तपणे हा कार्यक्रम घेतला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरूषोत्तम सदाफुले यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी स्वानंद महिला संस्थेच्या संस्थापक-अध्यक्षा प्रा. सुरेखा कटारिया होत्या.
प्रा. विक्रम काळे (गुणवंत प्राचार्य), सतीश मेहेर (सामाजिक क्षेत्र), लेखक व चित्रपट अभिनेते बाळासाहेब काकडे (कला क्षेत्र), प्रा. सुनिता नवले आणि प्रा. चंदाताई बोरा (क्रियाशील प्राचार्य), मधुरा लुंकड व रेणुका मीरपगारे (शैक्षणिक क्षेत्र) यांना सानेगुरूजी कृतीशील गुणवंत पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्ञानप्रबोधिनीच्या वृषाली डेन्गवेकर, उज्वला परदेशी यांनी खेळाच्या माध्यमातून मुलांचा शाब्दिक विकास कसा होऊ शकतो, याची माहिती दिली. मुलांच्या भाषा विकासासाठी सुसंवाद कसा वाढवावा, यावर डॉ. श्वेता राठोड यांनी मार्गदर्शन केले.
स्वानंदच्या अध्यक्षा सुनिता देसर्डा, सपना जैन, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे भोसरी शाखाध्यक्ष मुरलीधर साठे, पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, प्रा. दिगंबर ढोकले उपस्थित होते.