नगर – मागील आठवड्यात उत्तरा नक्षत्राचा पाऊस झाल्याचे कारण देत प्रशासनाने जिल्ह्यातील 23 छावण्या बंद केल्या आहेत. यात शेवगाव, कर्जत, जामखेड तालुक्यातील छावण्या बंद करण्यात आल्या असून केवळ कर्जत तालुक्यातील 32 छावण्या सुरु आहेत. त्यात 19 हजार 594 जनावरे आहेत.
गतवर्षी पावसाने हजेरी न लावल्याने जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी 511 चारा छावण्या मंजुर केल्या होत्या.यातील जूनपर्यंत 504 छावण्या सुरु होत्या. त्यात 3 लाख 36 हजार जनावरे दाखल होती. मागील तीन महिन्यात पावसाळा काही अपवाद वगळता कोरडाच गेला. त्यानंतर अनेक भागात पावसाने हजेरी लावली.त्यामुळे चारा छावण्यांची संख्या घटली. जुलैच्या सुरुवातीला साडेतीनशे छावण्या बंद झाल्या.आता ही संख्या 32 वर आली आहे.
शासनाने छावण्यांना दोनदा मुदतवाढ दिली असून दुसरी मुदत 30 सप्टेबरला संपत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा छावण्यांना मुदतवाढ मिळते का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्यातच अनेक तालुक्यात पाऊस न पडल्याने पुन्हा छावण्या सुरु करण्याची मागणी होवू शकते. त्यामुळे याबाबत शासन जे निर्देश देईल त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.