शहर तसेच उपनगरांतील चित्र; काही ठिकाणी नियम मोडीत
पुणे – महापालिकेतर्फे जीवनावश्यक वस्तू आणि शिजवलेले अन्न बेघर आणि कामगारांना पुरविण्यात येत आहे. मात्र, अनेक स्वयंसेवी संस्था आणि विविध संघटना स्वत:हून गल्लो गल्ली अन्नदान करीत आहेत. याठिकाणी मोठी गर्दी होत असून, त्यामुळे करोनाचे संक्रमण होण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुणे शहर तसेच उपगरांत याचे प्रमाण अधिक असल्याने हा प्रकार अन्नधान्य वाटप की “करोना’ वाटप, असे प्रश्न चिन्हे निर्माण झाले आहे.
शहर तसेच उपनगरांत अनेक संस्था, संघटना खाण्याचे पॅकेटस् वाटप करीत आहेत तर काही ठिकाणी धान्य आणि अन्य चीजवस्तूंच्या पिशव्यांचे वाटप केले जात आहे. मात्र या चीजवस्तू कोठे देत आहेत त्याचा माग काढत अनेक स्त्री-पुरुषांचे जथ्थे लहान मुलांना काखेत घेऊन शोधत फिरत असतात, जेथे अशा वस्तूंचे वाटप होत आहे तेथे ते गर्दी करत आहेत, असे चित्र सगळीकडे पहायला मिळत आहे.
या महिला-पुरुषांकडे आणि त्यांच्या मुलांकडे संक्रमण टाळण्यासाठी वापरण्यात येणारे मास्कही नसतात किंवा विलगीकरणाचा त्यांना मागमूसही नाही. हे लोक एकत्र, गप्पाटप्पा करीत ग्रुपने फिरत असल्याचे दिसून आले आहे.
स्थानिक नेते, पदाधिकारी यांनी झोपडपट्ट्यांमधील नागरिकांची लिस्ट काढून त्यांना घरोघरी अन्नधान्य वाटप केले आहे. परंतु, या गटागटाने फिरणाऱ्या नागरिकांचे काय करायचे, हे कोठून आले आहेत याचा मागमूस लागत नसल्याने, वाटप करणारे कार्यकर्तेही वैतागले आहेत. वारीच्या वेळीही अशाप्रकारे अन्नधान्य गोळा करून घरी घेऊन जाणारे महाभाग मोठ्याप्रमाणात दिसतात.
करोनाचे हे संकटही अशाप्रकारे सणवार असल्यासारखे साजरे करत रस्त्याने फिरून अन्नधान्याचे पॅकेटस गोळा करून त्याचा साठा डोक्यावर वाहात नेणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. त्यावर काहीतरी उपाय करा, अशी मागणी राजकीय पदाधिकारी, स्थानिक नेते यांच्याकडूनही केली जात आहे.