नवी दिल्ली – शिवसेनेने बंडखोर आमदारांपाठोपाठ बंडखोर खासदारांविरोधातही आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या लोकसभेच्या 12 खासदारांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी त्या पक्षाने केली आहे.
शिवसेना संसदीय पक्षाचे नेते संजय राऊत यांनी गुरूवारी येथे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. त्या भेटीत राऊत यांनी बंडखोर खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली. शिंदे गटाचा भाग बनलेल्या खासदारांनी याआधीच लोकसभेतील नेतेपदी राहुल शेवाळे यांची, तर मुख्य प्रतोदपदी भावना गवळी यांची निवड केली. त्या निवडींना बिर्ला यांनी काही दिवसांपूर्वी मान्यताही दिली.
लोकसभेत आम्ही कुठलाही स्वतंत्र गट स्थापन केलेला नाही. केवळ विनायक राऊत यांना त्या सभागृहातील पक्षाच्या नेतेपदावरून हटवण्यात आले, अशी भूमिका बंडखोर खासदारांनी घेतली आहे. आता शिवसेनेच्या मागणीनंतर बिर्ला काय भूमिका घेणार याविषयी उत्सुकता आहे. शिवसेनेवरील ताब्याविषयीचा वाद याआधीच सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या दारात पोहचला आहे. अशात शिवसेनेने पुन्हा लोकसभेच्या सभापतींचा दरवाजा ठोठावला आहे.