मुंबई – विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. या प्रकरणी दानवे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र दिले आहे. विरोधी नेत्यांनी सत्ताधारी नेत्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी देशद्रोह्यांबरोबर चहापान टाळले असे विधान केले होते. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.
मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर केला गेला आहे. याबद्दलची माहिती दानवे यांनी स्वत: दिली आहे. अंबादास दानवे म्हणाले, परवा सत्ताधारी पक्षाच्या चहापानावर आम्ही बहिष्कार घातला होता. कारण गेली आठ महिने सरकार शेतकऱ्यांसाठी कुठलेही निर्णय घेत नाही. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात निर्माण झाला आहे. ह्या गोष्टी सातत्याने होत आल्या आहेत.
मात्र मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रणाने हे देशद्रोही कोण? हा माझा प्रश्न आहे. आम्ही कोणता गुन्हा केला आहे. त्यामुळे आमच्या अधिकाराचा अपमान मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यामुळे आम्ही हक्कभंगाचा प्रस्ताव दिला, असे दानवे यांनी सांगितले.
खासदार संजय राऊत यांच्यावर सत्ताधारी पक्षाने हक्कभंग आणला म्हणून आपण आज प्रस्ताव दिला का?, त्यावर, आम्ही दोन दिवसांपासून हा विषय लावून धरला आहे. मात्र हा विषय चर्चेलाच आला नसल्याने पर्यायाने आम्ही हक्कभंगाची नोटिस दिली असल्याचे दानवेंनी म्हटले आहे.