पुणे, दि. 2 -शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी नियोजन करण्याबरोबरच रस्त्यावरील खड्डे भरताना तात्पुरते काम न करता नव्या तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर शिंदे यांनी पहिल्यांदाच मंगळवारी पुणे विभागीत आयुक्त कार्यालयात बैठक घेत विकासकामांचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी सूचनांचा अक्षरश: पाऊस पाडला. पुणे रिंगरोडसाठी आवश्यक भूसंपादनाच्या कामाला गती द्यावी लागणार आहे. भूसंपादनातील वादाचे मुद्दे लोकअदालतीच्या माध्यमातून सामोपचाराने सोडवावे लागतील. वाहतुकीचे नियोजन करताना रिंगरोडला जोडणाऱ्या मिसिंग लिंकचा समावेश करण्याची गरज आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील एकात्मिक वाहतूक आराखड्याबाबत मुंबई येथे एकत्रित बैठक घेण्यात येणार आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
माण, सपकळवाडीचा गौरव
करोनामुक्त गाव स्पर्धा योजनेंतर्गत माण (ता. मुळशी) आणि सपकळवाडी (ता. इंदापूर) या ग्रामपंचायतींनी कोविड व्यवस्थापनामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल या गावांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते “करोनामुक्त गाव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. ग्रीस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणाऱ्या वडगाव मावळ येथील हर्षदा गरुड हिचा यावेळी मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला.
मुख्यमंत्री उवाच…
तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यातील कामे वेगाने करावीत.
पंढरपूरचा विशेष विकास आराखडा तयार करावा.
त्यात रस्ते, पदपथ, स्वच्छतागृहे, स्नानगृहे अशा सर्व सुविधांचा त्यात समावेश करावा.
भीमाशंकर येथील विकासकामे उत्तम दर्जाची करावीत.
सर्व तीर्थस्थळांच्या विकासाबाबत एकत्रित सादरीकरण करावे.
गणेशोत्सव उत्साहाने साजरा होईल, या दृष्टीने गणेश मंडळांशी समन्वयाने नियोजन करावे.
उत्सव शांततेत पार पडतील याविषयी दक्षता घ्यावी.
डेंग्यू, मंकीपॉक्स आजाराबाबत दक्षता घ्या.
करोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी प्रबोधनावर भर द्यावा.
शाळा, महाविद्यालयांत लसीकरण शिबिरांचे आयोजन करावे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी.
कायदा व सुव्यवस्था राखावी.