आगामी निवडणुकांत एकदिलाने काम करण्याचे आवाहन
मंचर – देशात भाजप सरकारचा कारभार चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. ते देशातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत इतर प्रश्न निर्माण करून दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वातावरण तयार करत आहे, असा आरोप माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
यांनी केला.
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि मंचर नगरपंचायतीच्या होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शरदचंद्र पवार सभागृहात संपन्न झाला. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना वळसे पाटील बोलत होते.
यावेळी भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विष्णूकाका हिंगे, शरद बॅंकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, आदिवासी समाजाचे नेते सुभाषराव मोरेमारे, संजय गवारी, सुषमाताई शिंदे, भगवान वाघ, गणपतराव इंदोरे, उषाताई कानडे, प्रदीप वळसे पाटील, कैलासबुवा काळे, ज्ञानेश्वर गावडे, संतोष सैद, प्रदीप आमोडकर, अरविंद वळसे पाटील, सोमनाथभाऊ काळे, अंकित जाधव, क्रांतीताई गाढवे, संतोष भोर, निलेश थोरात यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य विविध संस्थांचे मान्यवर उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले, आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मजबूत असून निवडणुकीच्या तोंडावर गावात पक्षातच गट तयार होत आहेत. याचा फटका पक्षाला बसत आहे. त्यामुळे आरक्षण कोणाला जाहीर झाले, कुणाला नाही याचा विचार न करता सर्वांनी एकदिलाने एकत्र येऊन आपला उमेदवार कसा निवडून येईल, यासाठी काम करावे.
विवेक वळसे पाटील, देवदत्त निकम, क्रांतीताई गाढवे, सुभाष मोरमारे, विष्णुकाका हिंगे, सुहास बाणखेले यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पडवळ तर आभार जिल्हा परिषदच्या सदस्य अरुणा थोरात यांनी मानले.