चहा हे माझ्यासारख्या प्रत्येक मध्यमवर्गीय गृहिणीचे अमृत. भलेही सकाळी नाश्ता करायला उशीर झाला तरी चालेल पण सकाळी पहिला चहा हवाच. पण खरं सांगू, मला ना फक्त माझ्या हातचाच चहा प्यायला आवडतो. एखाद्याला असेही वाटेल की यात नवीन ते काय? तर नवीन हे आहे की, मला दुसऱ्या कोणाच्याच हातचा चहा प्यायला नाही आवडत. कारण चहाशी जुळलेले नाते. मग तो बिनदुधाचा असो की बकरीच्या दुधाचा, नाहीतर गायीच्या निरशा दुधाचा.
विचारांना चौफेर उधळायचे असेल तर हातात, मी बनवलेलाच चहा लागतो मला. माझे खिडकीतले गुलाब जेवढे मला प्रिय तेवढाच हातातला चहाचा कप आणि मनातील विचारांची वावटळ. कधी कधी असे भन्नाट कॉम्बिनेशन जमून येते की मस्त माहौल तयार होतो. चहाच्या प्रत्येक सिप नंतर शांत होत जाणारा मनातला कोलाहल आणि संपत जाणारा क्षण एकत्र अनुभवता येतो मग. या वावटळी चित्रदर्शी बनत जातात हळूहळू. अगदी काहीही दिसू शकतं.
पण आपण असतो की आपल्या मनाला, विचारांना अडवतो बऱ्याचदा. मनाला हवं तसं दृश्य तयार करण्याची परवानगीच देत नाही. बरेचदा असेही होते की, एखादा खोलवर दडवून ठेवलेला क्षण बंड करून नजरेसमोर उभा राहतो. मग त्याच्यासोबतच्या घुसमटलेल्या एखाद्या हुंदक्याचा आवाजही कानी पडतो. डोळे घट्ट मिटून घेतले तरी एखादा शेर, एखादी कवितेची साचलेली ओळ घरंगळत जाते. आठवतात काही नज्म. बुलबुल मला म्हणाला, आयुष्य हे दिवाने… काटा उरात आहे… ओठात धुंद गाणे…
मोह होतो त्या क्षणाचा पुन्हा एकदा. मग हरवून जायला होत पण हा क्षण इतका चतुर असतो ना की वर्तमानसोबत भागीदारी करून त्या भूतकाळाचे ही सुख उपभोगू देत नाही.
हातातला कप तसाच राहतो. चहा थंड होतो. आपली पुढच्या क्षणात जायची वेळ येते. तेव्हा शक्यतो नसावा निरोपाचा सोपस्कार. कारण बुद्धी वर्तमानात आलेली असते, मन मात्र अजून त्याच क्षणात. मग त्याचा लडिवाळ हट्ट, अजूनही तिथेच रेंगाळण्याची कसरत. खरंतर आपलीही. कळीचे उमलणे फुलाला जन्म देते आणि फूल उमलले की बहर जन्म घेतो.
फुलणे, उमलणे, सुकणे आणि पुन्हा फुलणे, उमलणे हा स्थायी भावच आहे निसर्गाचा. तो आपल्या कृतीतून हेच दाखवतो की, “पुनरपि जननं पुनरपि मरणं’ हा नियम प्रत्येकाला लागू आहे. मग कशासाठी अडकून राहायचे? जगून घ्यायचा समोर येणारा प्रत्येक भला वाईट क्षण. जेव्हा तुम्ही तुमच्याकडे जे आहे त्याचा किंवा तुम्हाला जे मिळाले आहे त्याचा तुलनात्मक विचार करू लागता तेव्हा तुमच्याकडे जे नाही त्याबद्दल वाटणारी खंत कमी होते.हा सिद्ध झालेला नियम आहे. इशळपस ीरींशर्षीश्र ळी र अलीं. ीरींर्ळीींवश ळी ींहश लशीीं ींर्हीेसहीं. तो तुम्हाला तुमच्याही नकळत तुमच्या आयुष्यातील सकारात्मक गोष्टी देऊन जातो. याचा अर्थ हा नक्कीच नाही की आयुष्यात नकारात्मक गोष्टी असूच नयेत. त्या असाव्यातच कारण त्याच आपल्याला सकारात्मकतेचे महत्त्व सांगतात.
सध्याच्या या वेगवेगळ्या इझम, वाद, चर्चा या सर्वांमध्ये मला ही सुसंवादीत अशी चाय पे चर्चा म्हणूनच आवडते. जी आयुष्य आणि त्यासोबतच्या सगळ्या गोष्टींची सकारात्मक सांगड घालते. म्हणूनच हातात चहाचा कप घेऊन विचारांना सुसाट दौडवायचे आणि आपसूक शांत होताना म्हणायचे, मिलेंगे… मिलेंगे फिरसे.
मानसी चिटणीस