केंदूर – येथील थिटेवाडी बंधाऱ्यातून सोमवारी दुपारी उजव्या कालव्यातून विसर्ग झाल्यामुळे परिसरातील शेतकरी आनंद व्यक्त करीत आहेत. बारमाही दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या केंदूरचा (ता. शिरूर) थिटेवाडी बंधारा दोन वर्षांनंतर यावर्षी एक महिना अगोदर शंभर टक्के भरल्याने केंदूरचे शेतकरी सुखावले आहेत.
पश्चिम भागात पर्जन्यमान जास्त झाले असले तरी केंदूर परिसरात पाऊस कमीच पडला आहे. शंभर टक्के बंधारा भरल्यानंतर पाणी वेळ नदीतून वाहून जात असल्याने त्या पाण्याचा वापर होत नाही. त्यामुळे धरणातून विसर्ग होणारे पाणी रोखून ते पाणी उजव्या कालव्यामार्फत सुक्रेवाडी आणि पऱ्हाडवाडीच्या दोन तळ्यात सोडले तर परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींची पाणी पातळी वाढणार असून आगामी काळात होणाऱ्या पाणी टंचाईला सामोरे जाण्यास मदत होईल. अशा आशयाचे थिटेवाडी बंधाऱ्यातुन पाणी सोडण्याचे मागणी पत्र पंचायत समिती सदस्या सविता पऱ्हाड यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत पाणी सोडण्याच्या उपाययोजना केल्याने परिसरातील शेतकरी सुखावले आहेत. त्यामुळे केंदूरचे ग्रामस्थ अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करत असल्याची माहिती उद्योजक प्रमोद पऱ्हाड यांनी दिली.