पुणे – ‘आरटीई’ अंतर्गत 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी पुण्यातील शाळांची नोंदणी प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे. यामुळे पालकांना बालकांचे ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवातच झालेली नाही. तर, प्रशासनाकडून पाठपुरावा केला जात नसल्याने शाळादेखील अनुत्साही असल्याचे चित्र आहे.
राज्यातील 8 हजार 957 शाळांना “आरटीई’ अर्थात बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी नोंदणी केलेली आहे. या शाळांमध्ये 1 लाख 271 प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत. पालकांना ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्यासाठी 16 फेब्रुवारीपासुन “आरटीई’ पोर्टलवर सुविधा उपलब्ध आहे. आतापर्यंत 53 हजार 302 अर्ज नोंदणी झालेली आहे. शाळांची नोंदणी पूर्ण झाली नसल्यामुळे पुणे, मुंबई, हिंगोली, जालना, परभणी, रायगड, सातारा या जिल्ह्यातील पालकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीची सुविधा अद्याप उपलब्धच झालेली नाही.
पुणे जिल्ह्यात 875 शाळांची नोंदणी झाली असून, 13 हजार 731 प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत. मात्र, अद्यापही 41 शाळांची नोंदणीच झालेली नाही. तसेच 52 शाळांनी नोंदणी केली असली, तरी त्याची पडताळणीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. यामुळे पालकांना अर्ज नोंदणीपासून अद्यापही वंचितच रहावे लागले आहे. पालकांकडून शिक्षण विभागाकडे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेबाबत विचारणाही करण्यात येऊ लागली आहे. दरम्यान, एक-दोन दिवसांत सुविधा सुरू होईल, असे त्यांना सांगण्यात येत आहे.
शुल्क प्रतिपूर्ती होईना
आरटीई प्रवेश प्रक्रियेत शासन स्तरावरून वेळेत शुल्क प्रतिपूर्ती केली जात नसल्याची ओरड संस्थांनी यापूर्वी अनेकदा केली आहे. मात्र, शासन-प्रशासन स्तरावर हालचाली होत नसल्याने खासगी शाळा या प्रक्रियेबाबत अनुत्सुक असल्याचे सांगितले जात आहे.