भदरवाह (जम्मू काश्मीर) : लॉकडाऊनमुळे जम्मू काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या पुण्यातील चित्रपट दिग्दर्शकाला स्थानिक मुस्लिम कुटुंबाने मदतीचा हात दिला आहे. जम्मू काश्मीरमधील पाहुण्याला मदत करणे हे काश्मिरीयत म्हणजे काश्मीरींचे स्वभाववैशिष्ट्य आपण अनुभवत असल्याचे नचिकेत गुट्टिकर या युवा चित्रपट दिग्दर्शकाने आपल्या मनोगतात म्हटले आहे.
नचिकेत सध्या जम्मू काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात गथा गावात नझिम मलिक यांच्या घरातच मुक्कामास आहे. लॉकडाऊन लागू झाल्यापासून गेल्या काही आठवडे तो याच घरचा पाहुणा बनून राहिला आहे. त्याच्याशिवाय त्याचे सहकारी शमीम कुलकर्णी आणि निनाद दातार यांनीही याच घरात मुक्काम केला आहे.
ही टीम 15 मार्च रोजी एका माहितीपटाच्या चित्रीकरणासाठी जम्मू काश्मीरमध्ये दाखल झाली होती. आपले काम संपवून 25 मार्च रोजी जम्मूवरून पुण्याकडे विमानाने परतण्याचे त्यांचे नियोजन होते. परतण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 24 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड -19 चा फैलाव रोखण्यासाठी देशभर तीन आठवडे लॉकडाऊनची घोषणा केली आणि या तिघांवर जम्मू काश्मीरमध्येच अडकून राहण्याची वेळ आली.
“लॉकडाऊन जाहीर झाला त्यावेळी आम्हाला खूप भीती वाटत होती. कारण रस्ते आणि हवाई वाहतूक बंद करण्यात आली होती.’ असे गुट्टिकर म्हणाले. प्रवासी अडचणीत असल्याचे पाहून मलिक कुटुंबीयांनी त्यांना आपल्या घरातच आश्रय दिला. याबाबत आम्ही खूपच भाग्यवान होतो. गेल्या कित्येक आठवड्यांपासून आम्ही या कुटुंबाबरोबर रहातो आहोत.
आता आम्हाला इथे अगदी घरच्यासारखेच वाटते आहे इतके सर्व कुटुंबीयांचे आमच्याबरोबरचे वर्तन अगदी मैत्रीपूर्ण आणि आपुलकीचे आहे, अशा शब्दात गुट्टिकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. इतके आदरातिथ्य अन्यत्र कोठेही बघायला मिळाले नसते. हीच खरी “काश्मिरीयत’ आहे. याच काश्मिरीयतबद्दल आपण नेहमी ऐकत असतो. आम्हाला त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
परप्रांतात अडकून पडलेल्या अनोळखी पाहुण्यांना आसरा दिल्यबद्दल मलिक कुटुंबीयदेखील स्वतःला भाग्यवान समजत आहेत. अशा अनपेक्षित आपत्तीच्या काळात मिळालेली ही आदरातिथ्याची अनोखी संधीच असल्याचे त्यांना वाटते आहे. आपण काही उपकार केलेले नाहीत. जर भविष्यात आमची मुलेही याच स्थितीत अडकली असती, तर त्यांनाही कोणी मदत केलीच असती, असे मलिक म्हणाले. जोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही, तोपर्यंत आमच्या घरात हे पाहुणे सुरक्षितपणे राहू शकतात, असेही त्यांनी सांगितले.