Digvijay Singh : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. याठिकाणी भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय नोंदवला आणि 163 जागा जिंकल्या. तर राज्यातील विधानसभेच्या 230 जागांपैकी काँग्रेसला केवळ 66 जागा जिंकता आल्या. भारतीय जनता पक्षाच्या या प्रचंड विजयानंतर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी आपल्या पक्षच्या पराभवाला ईव्हीएम मशीन जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तसेच या मशीनवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर दोन दिवसांनंतर दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा ट्विट करून ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले, “चीप असलेली कोणतीही मशीन हॅक केली जाऊ शकते. मी 2003 पासून हॅकिंग करत आहे. “मी 2003 पासून ईव्हीएमद्वारे मतदान करण्याचा विरोध केला आहे. हे हॅक केले जाऊ शकते हे मी अगोदरपासून म्हणत आलो आहे असे म्हटले आहे. तसेच “आम्ही भारतीय लोकशाहीला व्यावसायिक हॅकर्सच्या ताब्यात जाऊ देऊ शकतो का?” असा सवाल देखील यावेळी त्यांनी उपस्थित केला. दिग्विजय सिंह यांनी आपण उपस्थित केलेल्या शंकेवर सर्व राजकीय पक्षांनी विचार केला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
यापूर्वी दिग्विजय सिंह यांनी सोमवारी ट्विटच्या मालिकेत पोस्टल बॅलेटद्वारे मिळालेल्या मतांची माहिती शेअर केली होती. पोस्टल बॅलेटद्वारे झालेल्या मतांमध्ये काँग्रेस पक्षाला बहुतांश जागांवर भाजपपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. त्यावर,’जर जनता एकच असेल तर ईव्हीएम आणि पोस्टल बॅलेटच्या मतदान पद्धतीत एवढा फरक कसा? असा सवाल दिग्विजय सिंह यांनी उपस्थित केला.
पोस्टल बॅलेटच्या निकालांची माहिती देताना दिग्विजय सिंह यांनी लिहिले की, पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून आम्ही म्हणजेच काँग्रेस १९९ जागांवर आघाडीवर आहे, तर यापैकी बहुतांश जागांवर आम्हाला ईव्हीएम मतमोजणीत मतदारांचा पूर्ण विश्वास मिळू शकला नाही. तसेच “व्यवस्था जिंकली की जनता हरते, असेही म्हणता येईल.”असेही त्यांनी म्हटले आहे.