पुणे –देशातील पहिले डिजिटल विद्यापीठ महाराष्ट्रात लवकरच स्थापन होणार आहे, अशी ग्वाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. बदलत्या काळानुसार, तसेच उद्योगांच्या गरजांनुसार अभ्यासक्रमात बदल व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (पीआयबीएम) संस्थेच्या अकराव्या वार्षिक पदवी प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. एमबीए आणि पीजीडीएम अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या 2018-20 या तुकडीच्या 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना टोपे यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रे देण्यात आली. फायनान्स, मार्केटिंग, ह्युमन रिसोर्सेस, बिझनेस अनॅलिटिक्स आणि ऑपरेशन्स यांसारख्या शाखांमधील होते.
टोपे म्हणाले, “आपण काळाच्या मागे असलेला अभ्यासक्रम शिकवत असू, तर त्याला काही अर्थ नाही. विद्यार्थी पदवी घेऊन उत्तीर्ण होतील, परंतु ते बेरोजगार राहतील. शिक्षणासोबत विविध कौशल्यांचे प्रशिक्षण मिळाले पाहिजे. अनुभव आणि शिक्षण हे कळीचे मुद्दे आहेत. विद्यार्थ्यांनी नैतिकता, नितीमत्ता, नम्रता आणि तत्त्वे ही जीवनमूल्ये अंगिकारावीत.
शॉर्टकटच्या मार्गाने यशप्राप्तीचा दृष्टीकोन नसावा. करियरसोबतच सामाजिक बांधिलकी महत्त्वाची आहे. याप्रसंगी “पीआयबीएम’चे संस्थापक रमण प्रीत, प्रा. जहार शहा, अरविंद हाली आणि मनीष रोहतगी, डॉ. रितू आनंद, नागराज गरला, भास्कर बाबू रामचंद्रन आणि विवेक शर्मा व अन्य कंपन्यांमधील प्रख्यात उद्योगपती आदी उपस्थित होते.