पुणे- राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आल्याने शाळांच्या वेळेबाबत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या चर्चा करून स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा, अशा सूचना शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
करोनामुळे पावणेदोन वर्ष शाळा बंद ठेवून ऑनलाइन शाळा सुरू होत्या. मात्र, करोनाचे संकट आटोक्यात आल्यानंतर शाळा सुरू झाल्या आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या. इतर वर्गांच्या मात्र परीक्षा सुरू आहेत. काही शाळा उशिराने सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी व अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी एप्रिल अखेरपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. याला शिक्षक, पालकांकडून तीव्र विरोधही करण्यात आला होता. एप्रिलमध्ये उन्हाची तीव्रता अधिक असल्याने शाळा पूर्णवेळ सुरू ठेवणे शक्य नसल्याची भूमिकाही त्यांच्याकडून मांडण्यात आली होती.
गेल्या काही दिवसांपासून काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचे चटके बसू लागले आहेत. विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होता कामा नये यासाठी शाळांच्या वेळेत बदल करण्याची गरज भासू लागली आहे. दुपारच्या ऐवजी सर्वच शाळा सकाळी भरवाव्या लागणार आहेत. काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाराच्या अनुषंगाने संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांच्या बाबतीत निर्णय घ्यावा, अशा सूचना सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत.