मंचर – पुणे जिल्ह्यातील अंगणवाडीतील बालकांना मिळणाऱ्या पोषण आहारात गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करून त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई व्हावी, तसेच अंगणवाडीतील पोषण आहारविषयक इतरही समस्या तात्काळसोडवाव्यात. अन्यथा लोकशाही मार्गाने पुणे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करू, असा इशारा किसान सभा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनात दिला आहे.
जिल्हा अधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनात किसान सभेचे कृष्णा वडेकर, राजू घोडे, अशोक पेकारी आणि डॉ. अमोल वाघमारे यांनी म्हटले आहे की, करोनाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडीच्या बालकांना घरपोच पोषण आहार मिळावा, यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाने पुरवठादर नेमून घरोघरी धान्य पुरवठा सुरू करावा, असे नियोजन केले होते. हा पुरवठा करत असताना त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे, असा संशय आहे.
दिड किलो चणाडाळऐवजी 750 ग्रॅमचे पॅकेट देण्यात आले. काही ठिकाणी फक्त हरभरा दिलेला आहे आणि तोही 700 ग्रॅम. प्रत्येक अंगणवाडीतील बालकाला 1 किलो 400 ग्रॅम मसूर डाळीऐवजी 700 ग्रॅम देण्यात आली. याबरोबरच तेल व इतर धान्ये याबाबतही कमी धान्य दिल्याची किसान सभेची तक्रार आहे.