कोल्हापूर – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसोबत लाव रे तो व्हिडीओचा कार्यक्रम घेतला होता. तेव्हा तुम्हाला पवारांबद्दल कळलं नाही का ?, असा सवाल राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना केला आहे.
हसन मुश्रीफ यांनी एका वाहिनीशी बोलताना हा सवाल केला. राज ठाकरे यांनी शरद पवारांसोबत लाव रे तो व्हिडीओ हा कार्यक्रम घेतला होता, तेव्हा पवारांसोबत दौरे करत होते. तेव्हा त्यांना पवारांबद्दल कळलं नाही का? असा सवाल मुश्रीफ यांनी केला.
राज यांना भाजपसोबत सलगी करायची आहे. पण त्यांनी परप्रांतियांबाबत जी भूमिका मांडलेली आहे. त्यावर भाजप आडून बसला आहे. ते धुवून काढण्यासाठीच ते राष्ट्रवादीला टार्गेट करत असावेत. त्यांनी एकत्र यावेत, दोघांनी एकत्र संसार करावा पण राष्ट्रवादीला बदनाम करण्याची गरज काय?, असा सवालही मुश्रीफ यांनी केला आहे.
दरम्यान, भारतीय जनता पार्टीवरही त्यांनी यावेळी टीका केली. मध्यंतरी भाजपच्या नेत्यांनी दिल्ली दौरे केले. त्यानंतर त्या पक्षाचे नेते शांत झाले असल्याची टिप्पणी मुश्रीफ यांनी केली. दिल्लीहून परतल्यानंतर त्यांची आदळ आपट थंडावली असल्याचा टोला त्यांनी लगावला.