पुणे : देशात महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलं आहे. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवरून विरोधक केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका करत आहेत. मात्र मोदींच्या बचावासाठी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले सरसावले आहे.
ब्राह्मण महासंघाच्या वतीने ७५ व्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी गोखले यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. तसेच अभिनेत्री कंगना रनावत हिने स्वातंत्र्याविषयी केलेल्या वक्तव्याचं समर्थन केलं.
गोखले म्हणाले की, “ मोदी जेव्हा देशासाठी उभं राहतात तेव्हा ते माझे आदर्श नायक असतात. मोदी जेव्हा पक्षासाठी काम करतात तेव्हा मी त्यांच्या बाजूने उभा राहत नाही. महागाई काय मोदींनी वाढवली आहे का ? असा सवाल गोखलेंनी उपस्थित केला.
दरम्यान एका बॅरेलची किती किंमत झाली आहे तुम्हाला माहिती आहे का ? तुम्ही हॉटेलमध्ये एका वेळी १० हजार रुपये खर्च करु शकता पण एक व्यक्ती देशात गेल्या ७० वर्षांपासून जी घाण साचली आहे, ती साफ करत आहे. अशा व्यक्तीला काही काळ का होईना मदत करता येत नाही ? असा संतप्त सवाल विक्रम गोखले यांनी उपस्थित केला.
गोखलेंनी कंगनाच्या वक्तव्याचं समर्थन करताना म्हटलं की, कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो त्या वक्तव्याचे, कुणाच्याही मदतीने स्वातंत्र्य मिळाले नाही, ते भिकेनेच मिळाले आहे. आपले स्वातंत्रवीर जेव्हा फाशीवर जात होते तेव्हा फाशीपासून त्यांना कोणी वाचवलं नाही अनेकजण बघत राहिले असा गंभीर आरोप विक्रम गोखले यांनी यावेळी केला.
दरम्यान कंगनाच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवत देश कधीही हिरवा होणार नाही, हा देश भगवा राहिला पाहिजे, असं वक्तव्य गोखले यांनी केलं.