नवी दिल्ली – आपल्या अतुलनीय अभिनयाने हिंदी चित्रपट विश्वात एक खास ओळख निर्माण करणारे अभिनेते पंकज त्रिपाठी सध्याच्या काळात सर्वात व्यस्त अभिनेत्यांपैकी एक आहेत. काही काळ ओटीटी प्लॅटफॉर्मवर सतत दिसणारे पंकज त्रिपाठी आता थिएटर सुरू झाल्यानंतर मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांचे अनेक चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहेत. त्यापैकी ‘बंटी और बबली 2’ हा चित्रपट शुक्रवारी, 19 नोव्हेंबर 2021 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात एका हुशार पोलीस अधिकाऱ्याची भूमिका पंकज त्रिपाठी यांनी साकारली आहे. यासंदर्भात एका हिंदी वृत्तवाहिनीने त्यांची विशेष मु्लाखत घेतली. यावेळी त्यांनी पूर्वी चित्रपटाची वाट पाहावी लागत असे, मात्र आता चित्रपटाची लाईन लागली असल्याचे म्हंटले आहे.
बंटी और बबली चित्रपटातील भूमिकेबद्दल सांगताना पंकज त्रिपाठी म्हणाले, माझे पात्र एका पोलिसाचे आहे, जो स्वतःला अति हुशार समजतो आणि तो आहे देखील. चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला समजेलच. हा अधिकारी अतिशय रंगतदार आणि फिल्मी आहे. हा एक काॅमेडी आणि कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट आहे. बंटी और बबलीच्या पहिल्या भागात तुम्ही पाहिल्याप्रमाणे हा चित्रपट धमाल आणि गमतीशीर ठगांच्या अनेक कथा दाखवेल. त्यानंतरची ही कथा आहे. मजेदार आणि रंगीत.
सैफ अली खान आणि राणी मुखर्जी या दोन मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल त्रिपाठी म्हणाले, दोघेही खूप चांगले कलाकार आहेत. सेटवरचं वातावरण खूपच प्रसन्न होतं. आमचा दिग्दर्शक वरुण शर्माही तितकाच चांगला आहे. वरुण कानपूरचा आहे, त्यामुळे त्याला हे जग माहीत होते. राणी आणि सैफ सरांसोबत खूप आनंदी वातावरण होते. दोघेही खूप अनुभवी आहेत आणि सेटवर आनंदाने काम करतात. मी खूप चांगल्या वातावरणात काम केले आहे.
या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी हे दोन तरुण कलाकार काम करत आहेत, त्यांच्या कामाबद्दल त्रिपाठी म्हणआले, शर्वरीशी माझे बोलणे कमी होते पण ती खूप प्रामाणिक अभिनेत्री आहे. मी सिद्धांतला 10 वर्षांपासून ओळखतो, तो बलियाचा आहे. त्याला भेटल्यावर भोजपुरीमध्येच संवाद होतो. खूप मेहनती मुलगा आहे. त्याच्याबरोबर काम करायला मज्जा येते.
अनेक दिवसांपासून चित्रपटगृहे बंद होती, आता ती सुरू होत आहेत, पूर्वीसारखे वातावरण राहील असे वाटते का? याविषयावर बोलताना त्रिपाठी म्हणाले, प्रत्येक क्षेत्र हळूहळू उघडत आहे. लोकांच्या चेहऱ्यावर निराशा होती. या कठीण काळातही हा चित्रपट लोकांना हसवणार आहे. कठीण काळात लोकांना हसवणं ही सुद्धा एक मोठी उपलब्धी आहे. कोविडने प्रत्येक क्षेत्राला त्रास दिला होता. आता काही अंशी सर्व गोष्टी नियंत्रणात आहेत. आता वातावरण चांगले होईल.
चित्रपट जगतातील प्रवासाबद्दल बोलताना त्रिपाठी म्हणाले, पूर्वी चित्रपटांसाठी वाट पहावी लागायची, आता चित्रपटांची लाइन लागली आहे. पूर्वी महिन्यातून एकदा कॅमेरा बघायला मिळायचा, आता महिनाभर कॅमेऱ्यासमोर असतो. काम जास्त असल्यामुळे जीवन व्यस्त झाले आहे.