मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत २०२१ – २०२२ साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. कोरोनाच्या महामारीमुळे अडचणीत सापडलेल्या आपल्या देशाची पुढील दिशा काय असणार हे आजच्या अर्थसंकल्पात पाहायला मिळाले. अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या बजेटवर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यंदाच्या बजेटवर कडाडून टीका केली आहे.
जयंत पाटील म्हणाले की, यंदाचं बजेट अत्यंत वाईट असून पुढच्या वर्षीचं बजेट OLX वर मांडण्यात येईल का, असा प्रश्न पडतोय. त्यात विविध राज्यांना बजेटमधून पैसे देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही अत्यंत अनिष्ठ प्रथा आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पैसे वाटप करणं हे अत्यंत वाईट असल्याचं पाटील यांनी म्हटले आहे. केवळ उद्योगपतींसाठी हे बजेट असल्याचा प्रश्न आपल्याला पडला असल्याचे पाटील यांनी म्हटले.
सरकारकडून डिजीटल इंडिया करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. मात्र मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू महाग कशा होतील, हे सरकारने पाहिले. म्हणजे बोलयचं एक आणि करायच एक असं धोऱण सरकारचे आहे. करोना काळात सामान्यांना १० लाख कोटींच पॅकेज दिलं होतं. ते पॅकेज कुठं गेलं. देशातील महागाई नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे. सरकार दर अवाक्यात ठेवण्यापासून फार दूर आहे. स्मार्ट सिटीच काय झालं काहीही कळल नाही असही पाटील म्हणाले.
दरम्यान राज्याचे हक्काचे पैसे केंद्र सरकारकडून देण्यात येत नाही. केंद्र सरकारला महाराष्ट्राकडून कराच्या रुपाने सर्वाधिक फायदा होतो. इतर राज्यांना केंद्र सरकारकडून भरघोस मदत मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला काही तरी मिळेल अशी आशा होती. मात्र देवेंद्र फडणवीसांनीच नरेंद्र मोदींना महाराष्ट्राला मदत द्यायची नाही, अस काही सांगितलं का, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे पाटील म्हणाले. तसेच अशी कृती महाराष्ट्र कधीही मान्य करणार नाही, असंही पाटील यांनी नमूद केले.