मुंबई: भाजपची मगरमिठी स्वीकारली तरच राज्याचे हित या भ्रमात राहू नये, असा इशारा सामनाच्या मुखपत्रातून भाजपला देण्यात आला. “राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत येण्यास आजही तयार आहोत, पण जरी एकत्र यायची वेळ आली, तर निवडणुका एकत्र लढणार नाही”, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते.
“भाजपने स्वपक्षातील वैचारिक गुंता सोडवल्याशिवाय त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मनातले विचार कृतीत उतरणे कठीण आहे, असे एकंदरीत दिसते. प्रयत्न करून, जोरजबरदस्ती करून, घोडेबाजारात रान पेटवूनही एखादे सरकार पाडता येत नसेल तर मनाचा असा गोंधळ उडतो. तसा तो उडालेला दिसत आहे खरा. विरोधी पक्षाने आक्रमक व्हावे, पण स्वतःच निर्माण केलेल्या गुंत्यात फसून आरडाओरड करू नये. श्री. नड्डा हे संवेदनशील नेते आहेत. असा गोंगाट त्यांना चालत नाही. शूSSS शांतता राखा! आक्रमणाला वेळ आहे!” असे शिवसेनेने म्हटले आहे.
”महाविकास आघाडी सरकार स्वार्थासाठी स्थापन झाले असून आपली कमाई करणे एवढाच त्यामागे हेतू आहे,” असा टोला श्री. नड्डा यांनी मारला. भारतीय जनता पक्ष सध्या जे राजकारण करीत आहे ते असे कोणते परमार्थाचे लागून गेले आहे! मध्य प्रदेशात त्यांनी सरकार पाडले ते काय संतसज्जनांचा मेळा जमवून नक्कीच पाडले नाही. राजस्थानमध्येही मंत्रोच्चार वगैरे करून तेथील सरकार अस्थिर केले नाही, तर सरळ सरळ पैशांचा वारेमाप वापर करून आवश्यक ते बहुमत विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रावर टीका करण्याआधी हे सत्य स्वीकारले पाहिजे, असे खडे बोल शिवसेनेने भाजपला सुनावले.
“भाजपने आक्रमणाच्या तोफा फक्त महाराष्ट्रातच उडवल्या असे नाही. मध्य प्रदेश आणि राजस्थानातही त्यांनी तोफांच्या नळकांडय़ास बत्ती लावली आहे. मध्य प्रदेशचे सरकार पडले, तर राजस्थानचे सरकार सध्या तेथील राज्यपालांच्या बगलेत गुदमरलेले दिसत आहे. बहुमतात असलेली विरोधकांची सरकारे पाडायची ही आक्रमणाची पद्धत आहे. महाराष्ट्रात आक्रमणाचे मार्ग वेगळे आहेत हे सांगायची गरज नसल्याचे शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे.