देशभरातून आल्या 6,940 प्रवेशिका
नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत अॅप इनोव्हेशन चॅलेंजला भारतातील कंपन्या आणि तरुणांनी उत्तम प्रतिसाद दिला. यासाठी 8 वर्गामध्ये 6,940 प्रवेशिका आल्या आहेत. त्यातील 3,939 प्रवेशिका व्यक्तिगत पातळीवर तर 3001 प्रवेशिका कंपन्यांकडून आल्या आहेत. यातील 1,757 ऍप तयार असून ती लगेच वापरली जाऊ शकतात. तर 2,182 अॅप आणखी विकसित केले जाऊ शकतात.
व्यापार, आरोग्य, ई-लर्निंग, सोशल नेटवर्किंग, गेम्स, कार्यालयीन काम, मनोरंजन इत्यादी क्षेत्रांतून ही अॅप आली असल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितले आहे.
भारताने चिनी अॅपवर बंदी घातल्यानंतर देशातून अॅप विकसित व्हावीत याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामुळे स्वदेशी अॅपला चालना मिळेल.