पुणे – गणेशोत्सव, रविवार, ईद-ए-मिलाद, महात्मा गांधी जयंती या निमित्त मनपा कर्मचाऱ्यांना गुरुवार (दि.28 सप्टेंबर) सोमवार (दि. 2 ऑक्टोबर) अशी सलग पाच दिवस सुट्टी होती. या कालावधीत महापालिकेचा शहरी गरीब योजनेचा कक्षही बंद राहिला. त्यामुळे शहरातील किडनीच्या आजाराने ग्रस्त “डायलिसिस’वरील रुग्णांना खासगी रुग्णालयांच्या मनमानीचा फटका सहन करावा लागला.
सलग सुट्यांमुळे अनेक रुग्णांना पालिकेकडून पत्रच मिळाले नाही. त्यामुळे पदरमोड करून अथवा डायलेसिस न करताच घरीच थांबवे लागले. तर, गेल्या तीन दिवसांपासून पालिकेतही हे पत्र घेण्यासाठी मोठ्या रांगा लागलेल्या आहेत.
शहरी गरीब योजनेअंतर्गत “डायलिसिस’च्या 866 रुग्णांना पालिकेकडून प्रत्येकी दोन लाख रुपयांपर्यंतचा खर्च दिला जातो.
नागरिक गरजेनुसार महापालिकेच्या अथवा पॅनेलवरील रुग्णालयात जाऊन हे उपचार घेतात. तर, महापालिका या हॉस्पिटलला हे पैसे देते. मात्र, त्यासाठी आधी प्रत्येक “डायलिसिस’ला महापालिकेचे पत्र आवश्यक असते. अनेक रुग्णांना आठवड्यातून दोनदा अथवा तीनदा “डायलिसिस’ करावे लागते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची हेळसांड थांबवण्यासाठी पालिकेने आधी एका महिन्यासाठी, आणि नंतर प्रत्येकी तीन महिन्यांसाठी पत्र देण्यास सुरूवात केली आहे.
त्यानुसार एप्रिल ते जून, जुलै ते सप्टेंबर अशी पत्र दिली आहेत. आता ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यानच्या उपचारांचे पत्र घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना सलग सुट्यांचा फटका बसला. सुट्यांनंतर दि. 3 ऑक्टोबरला महापालिका सुरू झाली. त्यानंतर शेकडो नागरिकांनी पत्रासाठी रांगा लावल्या.
रुग्णालयांना पत्र देणार
सलग सुट्यांमुळे रुग्णांची गैरसोय झाल्यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले आहे. अशा सुट्यांच्या वेळी रुग्णालयांनी रुग्णांची अडवणूक करू नये, असे पत्र पॅनेलवरील रुग्णालयांना दिले जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख मनिषा नाईक यांनीक स्पष्ट केले. याशिवाय सलग सुट्यांच्या वेळी रुग्णांची गैरसोय होणार नाही, यासाठीही हा कक्ष सुरू करण्याबाबत नियोजन करण्यात येणार आहे, असे डॉ. नाईक यांनी सांगितले.